काँग्रेसला हवे आहेत प्रवक्ते, तुम्हीही करा अर्ज; मुंबई काँग्रेसतर्फे तरुणांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 06:42 IST2026-02-17T06:41:37+5:302026-02-17T06:42:53+5:30
मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे ‘टॅलेंट हंट’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवक्ते, संशोधन समन्वयक आणि प्रचार-प्रसार समन्वयक या पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

काँग्रेसला हवे आहेत प्रवक्ते, तुम्हीही करा अर्ज; मुंबई काँग्रेसतर्फे तरुणांना संधी
सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजकाल शाळेच्या ग्रुपपासून ते सोसायटीच्या बैठकीपर्यंत एकच चर्चा आणि उत्सुकता असते, तुम्ही उजवे की डावे? विचारसरणीची चाचपणी आणि राजकीय लेबल लावण्याची सवय सर्वसामान्यांनाही लागली आहे. अशा वातावरणात थेट राजकारणात नसलेल्या, पण काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या सर्वसामान्यांना मोठी संधी देण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला आहे.
मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे ‘टॅलेंट हंट’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवक्ते, संशोधन समन्वयक आणि प्रचार-प्रसार समन्वयक या पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. राजकारणात सक्रिय नसलेल्या पण पक्षाची विचारधारा पटणाऱ्या तरुणांना आणि व्यावसायिकांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
लग्नापूर्वी संबंध ठेवताना सावधान! विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत प्रवक्ता आणि अन्य पदांसाठी पक्षाकडे सुमारे ५०० अर्ज आले आहेत. इच्छुकांना २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. अर्जांची छाननी करून शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती विविध क्षेत्रांतील ३-४ तज्ज्ञ आणि वरिष्ठ नेत्यांची समिती घेणार आहे. अंतिम निवड झालेल्या नावांची शिफारस दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई कोकण विभागात येत असले तरी या शहरासाठी स्वतंत्र १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे नेतृत्व मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खा. वर्षा गायकवाड करत आहेत. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी या उपक्रमाला दुजोरा देताना सांगितले की, ‘काँग्रेसची विचारधारा मानणारा आणि पक्षासाठी काम करण्याची तयारी असलेला कुणीही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो.’
‘टॅलेंट हंट’
विचारांच्या पातळीवर सुरू असलेल्या चर्चांना आता संघटनेच्या पातळीवर संधीचे रूप मिळत आहे. काँग्रेसने ‘टॅलेंट हंट’च्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना राजकारणात पुढे आणण्याचे पाऊल टाकले आहे. त्याला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.