BMC Elections 2026 : मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; भाई जगतापांकडून वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी, पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:16 IST2026-01-17T20:15:05+5:302026-01-17T20:16:45+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय झाला, तर दोन नंबरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना राहिली. काँग्रेसनेही ही निवडणूक ताकदीने लढवली असून काँग्रेसला २४ जागांवर विजय मिळाला.

BMC Elections 2026 : मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; भाई जगतापांकडून वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी, पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस
BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिकेचे निकाल काल समोर आले. या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. दरम्यान, काँग्रेस पक्षात कलह सुरू झाल्याचे समोर आले. पक्षाच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार भाई जगताप यांनी केली.
‘देवाच्या मनात असेल तर…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर काँग्रेस पक्षाने जगताप यांना नोटीस पाठवून ७ दिवसांत उत्तर मागितले आहे.
वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी
"बीएमसी निवडणुकीतून समोर येणारे ट्रेंड आणि आकडे काँग्रेस पक्षाच्या इतिहासात दुर्दैवी आहेत. काँग्रेस पक्षाची स्थिती यापूर्वी कधीही इतकी वाईट नव्हती. या निवडणुकीत निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने आता याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. फक्त चिंता करू नका, तर काँग्रेस पक्षात काय चालले आहे यावरही चिंतन करा, असंही भाई जगताप म्हणाले.
भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या संघटनात्मक नेतृत्वाला पूर्णपणे अपयशी ठरवत योग्य नेतृत्व नसल्याचे म्हटले. "मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा तीव्र अभाव होता. निवडणुकीदरम्यान संघटना ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती तशी हाताळली नाही. समोर आलेल्या आकडेवारीची संपूर्ण जबाबदारी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची आहे." वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली होती.
भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
भाई जगताप यांनी खुले माध्यम आणि सार्वजनिक मंचांवर केलेली विधाने ही पक्षाच्या प्रस्थापित नियमावली, शिस्त आणि नैतिकतेच्या विरोधात आहेत. संघटनात्मक कामकाज, नेतृत्व आणि अंतर्गत मतभेद हे पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे पक्षाच्या सामूहिक नेतृत्वाला धक्का बसतो, पक्षाची प्रतिमा मलिन होते तसेच सध्या आवश्यक असलेल्या संघटनात्मक एकतेला बाधा पोहोचते, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर न दिल्यास, काँग्रेसकडून पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
