मुंबईत शासकीय रक्तपेढींत रक्तसाठा अपुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:14 IST2026-05-19T10:13:50+5:302026-05-19T10:14:00+5:30
नियमित रक्तदान वाढल्यास भविष्यातील रक्तटंचाई टाळता येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत शासकीय रक्तपेढींत रक्तसाठा अपुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एप्रिल महिन्यात परीक्षा कालावधी आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गावी जात असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी होते. परिणामी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तपेढ्यांमधील साठा घटल्याचे दिसून येत आहे. रक्तदानासाठी महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा प्रतिसाद कमी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
दरम्यान, राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मुंबईमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तटंचाई जाणवत आहे. सहज उपलब्ध मानला जाणारा ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटदेखील अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच ‘ओ निगेटिव्ह’ आणि ‘बी निगेटिव्ह’ या दुर्मिळ रक्तगटांचाही तुटवडा आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांना आवश्यक रक्त मिळवण्यासाठी खासगी रक्तपेढ्यांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची अडचण वाढली आहे. तसेच थॅलेसेमिया, सिकलसेल यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना १५ दिवसांनी नियमित रक्त द्यावे लागते. रक्तसाठ्यातील ही घट कायम राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.