जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:11 IST2026-01-19T06:10:10+5:302026-01-19T06:11:45+5:30
जगाकडे आध्यात्मिकता नाही, आपल्याकडे वारसा

जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत
मुंबई : जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करीत राहील, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले. जगाकडे या प्रकारचे ज्ञान नाही. कारण तेथे आध्यात्मिकतेची कमतरता आहे. आपल्याला पूर्वजांकडून हा वारसा मिळाला आहे, असेही ते म्हणाले.
येथे एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, धर्म संपूर्ण विश्व चालवतो आणि सर्व काही त्याच तत्त्वावर चालते. भारताला पूर्वजांकडून समृद्ध आध्यात्मिक वारसा मिळाला आहे. महान ऋषी आणि संतांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
... धर्म हाच विश्वाचा चालक
नरेंद्र मोदी असोत, मी-तुम्ही असाल किंवा इतर कुणीही असो, आपण सर्व एकाच शक्तीने चालतो. त्या शक्तीवर वाहने चालली तर कधीही अपघात होणार नाहीत. तो चालक म्हणजे धर्म होय, असे भागवत म्हणाले.
आध्यात्मिक संशोधनातून नियम समजले : राज्य धर्मनिरपेक्ष असू शकते. परंतु, कोणताही मानव किंवा कोणतीही सृष्टी धर्मापासून मुक्त असू शकत नाही. पाण्याचा धर्म वाहणे आणि अग्नीचा धर्म जाळणे आहे. पुत्राचे जसे कर्तव्य, तसेच शासकाचे कर्तव्य आहे, आचारसंहिता आहेत. आपल्या पूर्वजांना आध्यात्मिक संशोधन आणि महान प्रयत्नांद्वारे हे नियम खऱ्या अर्थाने समजले असल्याचे भागवत यांनी नमूद केले.