विघ्नहर्त्याच्या मार्गावर खड्डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:03 IST2019-08-24T00:02:38+5:302019-08-24T00:03:30+5:30
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे.

विघ्नहर्त्याच्या मार्गावर खड्डे!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे. सर्वजण गणराय आगमनाच्या जय्यत तयारीत आहेत. मात्र पालिकेकडून पूर्वतयारीला अजून सुरूवात करण्यात आली नाही. शहरात जागो-जागी असलेले खड्डे गणरायाच्या आगमनात अडथळे आणणारे ठरणार असून पालिकेकडून पूर्वतयारीचे नियोजनही नाही, हे विशेष.
सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध गणेश मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. परंतु नेहमीप्रमाणेच गणरायाच्या आगमनावेळी अडथळे आणणाऱ्या खड्ड्यांच्या दुरूस्ती कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती सर्वत्रच पाहायला मिळते. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील खड्ड्यांच्या दुरूस्तीला यंदाही अद्याप सुरूवात झाली नाही. २ सप्टेंबर रोजी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेत शहरात पूर्वतयारी म्हणून खड्डे बुजविणे, अडथळा करणाºया झाडांच्या फांद्या, स्वच्छता मोहीम यासह विविध कामे पालिका हाती घेते. परंतु ही कामे दरवर्षीच ऐनवेळी केली जातात. त्यामुळे अनेकदा कामे पूर्ण होत नाहीत, किंवा अपुरे राहिल्याने अनेक अडचणींणा तोड द्यावे लागते.
विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. शिवाय संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र ही कामे वेळेत होत नाहीत. गणेश मूर्ती स्थापनेच्या ऐन दोन दिवसाअगोदर शहरातील दुरूस्ती कामे हाती घेतली जातात. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. याचा फटका गणेश मंडळांना बसतो.
हिंगोली शहरालगत नवीन वसाहतीमध्येही गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाते. परंतु त्या ठिकाणी पालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. अनेक ठिकाणी तर रस्तेच उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पालिका आता याबाबत कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सव काळात ज्या काही आवश्यक सुविधा आहेत, त्या वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाभरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
...तर कार्यवाही; पालिकेकडून दुरूस्ती मोहीम
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर नगर पालिकेकडून पूर्वतयारी म्हणून शहरातील रस्ते दुरूस्ती, वीजसमस्या, पथदिवे बसविणे यासह विविध कामे केली लवकरच केली जातील, असे नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.