अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) इंडस्ट्रीत अनेकांसोबत काम केलं आहे. तिचं कोणाशी वाकडं असेल असं कधीच ऐकण्यात आलेलं नाही. मात्र तुम्हाला माहितीये का विद्या बालनने एकदा अक्षय खन्नासोबत (Akshay Khanna) काम करण्यास नकार दिला होता. बऱ्याच वर्षांनंतर ती दुसऱ्या सिनेमाच्या सेटवर जेव्हा अक्षयला भेटली तेव्हा इतकी घाबरली की तिने जॉन अब्राहमकडे धाव घेतली. काय घडलं होतं?
बॉलिवूड हंगामाशी बोलताना विद्या बालन म्हणाली होती की, "मला एक सिनेमा ऑफर झाला होता ज्यात अक्षय खन्ना होता. मला काही कारणांमुळे स्क्रिप्ट आवडली नाही आणि मी सिनेमा न करण्याचा विचार केला. मी मॅनेजरला सांगितलं की दिग्दर्शकाला माझा नकार कळवा. मी त्यांचे फोनही उचलले नाहीत. यानंतर मी 'सलाम-ए-इश्क'च्या सेटवर अक्षय खन्नाला भेटले. तेव्हा तो मला म्हणाला की तुला सिनेमा करायचा नाही हे तू मला का नव्हतं सांगितलं. मी थेट कोस्टार जॉन अब्राहमकडे गेले आणि म्हणाले, 'मला वाचव'. कारण मी तेव्हा इंडस्ट्रीत नवी होते आणि मला अक्षय खन्नाचा सामना करायचा नव्हता. मला त्याला दुखवायचं नव्हतं. मला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं असं त्याला वाटू नये हाच माझा उद्देश होता. पण नंतर मला कळलं की अक्षय मला फक्त चिडवण्यासाठी तसं म्हणाला."
ती पुढे म्हणाली, "मी कोणासोबत असभ्य वागत नाही. मला जे योग्य वाटलं ते मी बोलले. पण एक स्क्रिप्ट बनवायला किती वेळ लागतो मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा आदर करते." विद्या बालन नुकतीच 'भूलभुलैय्या ३' मध्ये दिसली. लवकरच ती 'कहानी'च्या सीक्वेलमध्ये दिसणार असल्याचीही चर्चा आहे.