Manoj Kumar Passes Away: हिंदी सिनेविश्वातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गद अभिनेते मनोज कुमार (manoj Kumar) यांचं आज निधन झालं आहे. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हळहळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनोज कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान मोदींनी मनोज कुमार यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत पोस्ट लिहिली आहे की, "दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमारजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. विशेषतः त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमधील भूमिका कायम लक्षात ठेवल्या जातील. त्यांची देशभक्ती या चित्रपटांमध्येही दिसून येत असे. मनोजजी यांच्या कार्यांनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आणि ती येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती..." अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
आपल्या चित्रपटांमधून देशभतक्तीची भावना जागृत करणारे हे मनोज कुमार यांना 'भारत' या नावाने ओळखलं जायचं. मनोज कुमार यांनी त्यांच्या अभिनय कारकिरर्दीत अभिनयाबरोबरच चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. 'मेरी आवाज सुनो', 'नसीब','नीलकमल','पत्थर के सनम' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मनोज कुमार यांना त्यांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं.