Kapil Honrao: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asata) या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटू लागलं होतं. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने काही महिन्यांपूर्वी २५ वर्षांचा लीप घेतला. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत मल्हार हे पात्र अभिनेता कपिल होनरावने (Kapil Honrao) साकारलं होतं. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे अभिनेत्याच्या फॅनफॉलोइंगमध्येही चांगलीच वाढ झाली. दरम्यान, कपिल सध्या सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आलाय. या व्हिडीओद्वारे अभिनेत्याने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे.
कपिल होनरावने मुंबईतील अंधेरी या ठिकाणी स्वत: चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करत आनंदाची बातमी सांगितली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कपिलने नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय. शिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलंय, "मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि ते ही अंधेरी सारख्या ठिकाणी. ४ कपडे एक छोटीशी बॅग आणि खिशात १,५०० रुपये घेऊन गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या पोरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडुपला १० बाय १० च्या खोलीमध्ये राहताना माझा जीव गुदमरल्यासारखा व्हायचा. काडीपेटीसारखी घरं वाटायची. असं वाटायचं यार, कुठे आलोय आपण? मुंबई फिल्ममध्ये जशी पाहतो तशी नाहीये. कुठे राहतोय आपण? ऑडिशनसाठी अंधेरीला यायचो तेव्हा मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या की वाटायचं यार, ही खरी मुंबई इथे घर असलं पाहिजे."
पुढे कपिलने लिहलंय की, "ऑडिशन झालं की मित्रांसोबत फिरताना उगाच बोलायचो इथे घर घेईन मी. तू तिथे घे... पण त्या वेळी ते फक्त स्वप्न असायचं. तुम्हाला ही मुंबई लगेच आपलसं करत नाही. खूप परीक्षा घेते. तुमचं temperament चेक करते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावं, असं वाटायच. पण माझ्यासोबत अगदी सुरूवातीपासून कायम एक खंबीर मुलगी होती. आज या मुंबईत आणि इंडस्ट्री मध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबतीमुळे आहे. हे घर सुद्धा तिच्या सोबती शिवाय शक्यच झालं नसतं. पैसे आले की उधळपट्टी करणारा मी, पण एक-एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली. रेणू आज मला खूप आनंद होतोय की तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देतोय. हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि या फाटक्या पोराचा हात ज्या विश्वासाने तू धरलास; आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस. त्याने लग्नानंतर ५ वर्षात , इतक्या कमी वयात करोडोच्या वरच घर घेतलं. तू नेहमी बोलतेस...'आप खुद पे विश्वास करो, आप कर लोगे 'आज मला खूप आनंद होतोय . की तुझा विश्वास मी सार्थ ठरवला. I love you.. just be with me..."