Tharala Tar Mag Serial : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही स्टार प्रवाह वाहिनीलवरी लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका घराघरात मोठ्या आवडीने पाहिली जाते. सध्या 'ठरलं तर मग' मध्ये अर्जून-तन्वीच्या लग्नाचा सीक्वेंस चालू आहे. पूर्णा आजीला दिलेल्या वचनामुळे अर्जुन मनाविरुद्ध हे लग्न करणार असतो. पण, सायलीने मात्र कोणत्याही परिस्थिला सामोरी जाऊन ‘मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करेन’ असा निर्धार मनाशी पक्का केल्याचं मालिकेत पाहायला मिळतंय. त्यामुळे मालिका सध्या चर्चेत आहे. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर 'ठरलं तर मग'चा नवा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, लग्नं मंडपात अर्जुन-तन्वी बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यावेळी अर्जुनची आई कल्पना त्याला तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगते. परंतु त्यादरम्यान, सायली मोठमोठ्याने सनई वाजवते. सनईचा तो आवाज ऐकून तन्वीला राग अनावर होतो आणि ती म्हणते- कोण आहे तिथे.
पुढे प्रोमोमध्ये दिसतंय, त्यानंतर बॅंडवाल्याच्या वेशभूषेत एक व्यक्ती मंडपात अर्जुन-तन्वीच्या लग्नमंडपात येते आणि तन्वीच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणते- "अर्जुन सरांची बायको..., सौ. सायली अर्जुन सुभेदार. मी आले ठरल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याशी लग्न करायला." त्यादरम्यान, बॅंडवाल्याच्या वेशभूषेत सायलीला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. हा प्रोमो पाहून 'ठरलं तर मग' मालिकेचे चाहते देखील सुखावले आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, आता यांच्या प्रेमाच्या लढाईत कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.