काल (२ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालं. जरांगे मुंबईत आल्यावर पुढील पाच दिवस उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढले, त्यामुळे जरांगेंच्या उपोषणाला यश आलं. पाच दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयी उत्सव साजरा केला. मराठा आंदोलनाच्या याच विजयावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने केलं अभिनंदन
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनाची गर्जना केली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांतून मराठा बांधव मुंबईत एकवटले. मराठ्यांची ताकद काय असते हे मराठा आंदोलकांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं. याच आंदोलनाच्या यशावर प्राजक्ता गायकवाडने केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. प्राजक्ता गायकवाडने इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, ''जेव्हा जेव्हा मराठा लढतो, तेव्हा तेव्हा इतिहास घडतोच''. याशिवाय प्राजक्ताने आरक्षण आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल समस्त मराठा बांधवांचं अभिनंदन केलंय.
प्राजक्ताने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी रिअॅक्शन देऊन तिच्या पोस्टला समर्थन केलंय. मराठा आरक्षण संदर्भात सरकारने निकाल दिल्यावर मनोज जरांगेंनी आनंद व्यक्त केला. याशिवाय पाच दिवस उपोषण करत असल्याने त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे जरांगेंना पुढील उपचारांसाठी संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ''जिंकलो रे राजेहो! आपण तुमच्या ताकदीवर...आज कळलं गरिबाची ताकद किती मोठी आहे'', असे आनंदोद्गार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठा बांधवांच्या साक्षीने काढले.