इंद्रा आणि दीपू यांच्या प्रेमाची कथा असलेल्या ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zhala) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. इंद्रा व दीपू साकारणाऱ्या अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे या जोडीच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडले. इंद्रा आणि दीपू यांच्याबरोबरच सत्तू, देशपांडे सर, मालती काकू, शलाका, जयश्रीकाकू ,सानिका, कार्तिक, मुक्ता, बाबूकाका, मॅनेजर सर, कानविंदे काकू, नयन ही सगळीच पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. मात्र काही दिवसांपूर्वी ही मालिका निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. नुकतंच मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पार पडलं.
आता मालिका संपणार असल्याने सगळेच कलाकार दुरावणार आहेत. त्यामुळेच नुकताच या कलाकारांनी सेंड ऑफ पार्टी करत एकमेकांना निरोप दिला. या पार्टीच्या निमित्ताने कलाकारांनी गेल्या वर्षभरातील सेटवरील अनेक आठवणींना उजाळा दिला. अशात मालिकेत कार्तिक साळगावकर ही भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडके (Ruturaj Phadke)याने आपल्या एका सहअभिनेत्रीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर (Purnima Talwalkar) यांनी या मालिकेत इंद्रा आणि कार्तिकच्या आईची भूमिका साकारली आहे. ही मालिका संपल्यानंतर नुकतंच कार्तिकने पूर्णिमा यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.
वाचा, ऋतुराजची पोस्ट
‘आमच्या सेटवरची सर्वात गोड मुलगी.. होणार सून मी ह्या घरची ही मालिका आमच्या घरी रोज बघायचे, त्यात पौर्णिमा ताईने साकारलेली बेबी आत्या म्हणजे अप्रतिम होती. पण तिचा खूप राग यायचा, मी एक समज केला होता, खूप खडूस असणार ही बाई, (त्यात हीचे डोळे घारे...) आधी मी एक मालिका करत होतो, तेव्हा पण ती एक दोन वेळा सेटवर येऊन गेली, पण कधी बोलण नव्हतं झालं, कारण सुद्धा हेच की मी घाबरायचो हिला. कालांतराने असा योग आला मन उडू उडू झालं या मालिकेत ती माझी आईची भूमिका करणारा होती. पहिल्या दिवशी जरा घाबरत बोलो, पण ह्या पोरीने पुढच्या दोन ते तीन तासात मला एकदम कम्फर्टेबल करून टाकला.. स्वत:हुन माझ्याशी बोलायला आली, आमच्याबरोबर फोटो काढायला आली... आणि आज आता असं झालं आहे की, सेट वर किंवा मेकअप रूममध्ये माझ्या आजूबाजूला ती हवी, सतत तिचा हसतमुख चेहरा दिसायला हवा, नाही दिसला तर कंटाळा यायला लागतो. आता अस झालं आहे की ती माझी खरीच आई वाटायला लागली. रोज आमच्या सगळ्यांसाठी घरातून डबा घेऊन येते, सतत हसतमुख असते, सेट वर तिला कधीच कोणावर चिडलेल मी पाहिलं नाही. आणि आता सध्या ती रिल करण्यात बिझी आहे. अशी आहे माझी गोड पूर्णिमा तळवळकर.., असे ऋतुराज फडकेने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या जागी आता ‘तू चाल पुढं’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.