Join us

प्रसिद्ध गायक डिप्रेशनमध्ये, भावासोबतच्या नात्यात आलेल्या तणावासाठी कुटुंबाला धरलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:41 IST

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत प्रसिद्ध गायक आहेत. नक्की झालंय काय?

९० च्या दशकात आपल्या गाण्यांनी सर्वांना प्रेमात पाडणारे अनु मलिक यांचे दोन भाचेही इंडस्ट्रीत आहेत. अरमान (Armaan Malik)आणि अमाल मलिक (Amaal Malik) दोघंही सख्खे भाऊ गायक आहेत. 'घर से निकलते ही' हे अरमान मलिकचं गाणं खूप गाजलं. तर अमाल मलिकने सलमान खानच्या जय हो सिनेमासाठी गाणं गायलं आहे. तसंच खूबसूरज मधलं प्रसिद्ध 'नैना' हे गाणंही गाजलं. नुकतंच अमाल मलिकने पोस्ट शेअर करत तो नैराश्यात असल्याचा खुलासा केला आहे. तसंच भावासोबतच्या नात्यात आलेल्या तणावाला कुटुंबच जबाबदार असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं.

अमाल मलिकने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिले, "मी अशा स्टेजवर पोहोचलो आहे जिथे मी सहन करत असलेल्या त्रासावर आता मी आणखी शांत बसू शकत नाही. माझ्यात कमीपणा आहे हे मला सतत जाणवून देण्यात आलं जेव्हा की मी आपल्या लोकांसाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. मी माझं प्रत्येक स्वप्न मोडलं. घाम, रक्त आणि अश्रू ढाळून गेल्या दशकभरात मी १२६ ट्यून्स बनवल्या आणि रिलीज केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी माझा आत्मविश्वास, माझी मैत्री, माझ्या नात्यात अडचणी आणण्यात काहीच कमी केलं नाही. मी फक्त पुढे जात राहिलो कारण मला माहित होतं मी करु शकतो. आज माझ्याकडे जे काही आहे ते माझी बुद्धी आणि देवाच्या आशीर्वादानेच आहे."

"आज माझी शांतता भंग करण्यात आली आहे. मी भावनिकरित्या खचलो आहे. आर्थिक रुपानेही खचलो आहे पण मला त्याने काही फरक पडत नाही. मी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे यामुळे मला फरक पडतो. हो, माझ्या कृतीसाठी मी स्वत:लाच दोषी मानू शकतो मात्र माझ्या आत्मसम्मानाला काही प्रिय लोकांच्या कामामुळे ठेच लागली आहे. त्यांनी माझ्या आत्माचे तुकडे केले आहेत. मला आणि माझ्या भावाला सतत याचा मुलगा, त्याचा भाचा असंच म्हणलं गेलं. आमच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. पालकांमुळेच आम्हा भावांमध्ये दुरावा आला आहे. मी मनावर दगड ठेवून सांगतो की आज मी माझ्या कुटुंबासोबत सर्व नाती तोडत आहे. यापुढे माझं त्यांच्याशी केवळ प्रोफेशनल नातं असेल. मी हा निर्णय रागात घेतलेला नसून माझं सुखी आयुष्य परत मिळवण्यासाठी घेतला आहे."

अमाल मलिकने काही वेळाने ही पोस्ट डिलिट केली. तसंच त्याने माझ्या कुटुंबाविषयी काही बोलू नका अशी विनंती केली. यावर जास्त चर्चा करु नका असंही तो माध्यमांना म्हणाला. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो मात्र आता दूर राहून करत राहीन असंही त्यान लिहिलं. आम्हा भावांमध्ये काहीही बदललेलं नाही, अरमान आणि मी एक आहोत आणि आमच्यामध्ये काहीही येऊ शकत नाही असंही त्याने स्पष्ट केलं. 

टॅग्स :अरमान मलिकबॉलिवूडसंगीतसोशल मीडियापरिवार