Join us

'मला बाहेर पडणंदेखील कठीण झालंय'; 'सैराट'फेम अरबाजच्या 'त्या' पोस्टवर पुण्यातील रिक्षाचालकाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:03 IST

Arbaz shaikh: काही दिवसांपूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने पुण्यातील मुजोर रिक्षाचालकाने केलेल्या फसवणुकीविषयी आणि त्याच्या उद्दमपणाविषयी भाष्य केलं होतं.

नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या 'सैराट' (sairat) चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे अरबाज शेख (arbaz shaikh). या चित्रपटात सल्ल्या ही भूमिका साकारुन अरबाज विशेष लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने पुण्यातील मुजोर रिक्षाचालकाने केलेल्या फसवणुकीविषयी आणि त्याच्या उद्दमपणाविषयी भाष्य केलं होतं. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर कमालीची चर्चा झाली. त्यानंतर आता अरबाजने आरोप केलेल्या रिक्षाचालकाने त्याची बाजू मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी अरबाजने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एका रिक्षाचालकामुळे कशाप्रकारे मनस्ताप झाला हे सांगितलं. सोबतच त्याने या रिक्षाचालकाचा पाठमोरा फोटो शेअर करत त्याच्या रिक्षाचा नंबरदेखील शेअर केला. तेव्हापासून या रिक्षाचालकाला अनेकांकडून त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच, या रिक्षाचालकाने प्रसारमाध्यमांसमोर त्याची बाजू मांडली आहे.

अरबाजने फोटो शेअर केलेल्या रिक्षाचालकाचं नाव आसिफ मुल्ला अरबाज असं आहे. या रिक्षाचालकाने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अरबाजच्या पोस्टमुळे मला नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचंही म्हटलं आहे.

काय म्हटलंय या रिक्षाचालकाने?

“अरबाजने केलेल्या पोस्टमुळे मला घराबाहेर पडणं कठीण झाले आहे. अरबाजने धायरी फाट्याजवळ रिक्षा बुक केली होती. तिथून त्याला पुण्यात जाऊन ट्रेन पकडायची होती. त्यासाठी १९८ रुपये आकारण्यात येणार होते. मी गुगल मॅपच्या मदतीने रिक्षा भिडे पुलाजवळ नेली. मात्र पुलावर नदीचं पाणी आल्यामुळे पोलिसांनी तो रस्ता बंद केला होता. मात्र काही जण धोका पत्करुन तो पूल ओलांडत होते. अरबाजची सहा वाजताची ट्रेन होती, असे त्याने मला सांगितले. त्यामुळे मी भिडे पुलावरुन रिक्षा घेतली. पण पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मी त्या पाण्यात रिक्षा नेसण्यास नकार दिला. समोर धोका असताना त्या संकटात कसं काय रिक्षा घेईन जाणार? त्यामुळे मी तुम्ही इथून जाऊ शकता फक्त एवढंच त्याला म्हटलं. तसंच रिक्षातून खाली उतरा असं मी त्याला कधीही सांगितलं नाही", असं रिक्षाचालक आसिफ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "तसंच जर स्टेशनपर्यंत जायचं असेल तर मार्ग बदलून जावं लागेल. अंतर जास्त असल्यामुळे रिक्षाचं भाडंदेखील वाढेल असंही मी त्याला सांगितलं. त्यानंतर रिक्षा आप्पा बाळवंत चौकातून कुंभरवाड्यामधून स्टेनशनवर नेली. त्यानंतर त्याने मला पैसे दिले आणि तो निघून गेले. या सगळ्या धावपळीत मी त्यांना शिवी वगैरे काहीच दिली नव्हती. त्याने माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. आजपर्यंत कधीही कंपनीकडे माझी तक्रार गेलेली नाही. फक्त नदीचं पाणी वाढल्यामुळे त्या पुलावरुन रिक्षा नेता येणार नाही असं मी म्हणालो होतो. तसंच ही रिक्षा अरबाजच्या मित्राने बूक केली होती. रिक्षात बसतानाही अरबाजने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यामुळे मी त्याला ओळखू शकलो नाही.जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर त्यांना मी स्टेशनला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अरबाजने सोशल मीडियावर माझं नाव, रिक्षाचा नंबर शेअर केल्यामुळे मला अनेकांचे फोन यायला लागले. ज्यामुळे माझ्या घरातही चिंतेचं वातावरण पसरलं. या सगळ्या व्यापात मला आता घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. मी असिफ मुल्ला एवढंच सांगेन की, मी अरबाजला शिवी दिलेली नाही. जर दिली असती तर त्याच क्षणी मी माफीही मागितली असती."  

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमापुणे