भारत आणि पाक दोन्ही देशांमध्ये झालेल्या तणावाच्या परिस्थितीत देशवासियांनी पाकविरोधात संताप व्यक्त केला. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अशीच अनेकांची मागणी होती. दरम्यान शांतीचा नारा देणारे बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र मूग गिळून गप्प बसले होते. कोणीही पाकिस्तानचं नाव घेतलं नाही. तर तिकडे पाकिस्तानी कलाकारांनी मात्र भारताची निंदा केली. तरी भारतीय सेलिब्रिटी गप्प होते याचा आता प्रत्येकाच्या मनात राग आहे. दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) मात्र पाकिस्तानचं नाव घेत आपलं मत रोखठोक मांडलं आहे.
युद्ध हे उत्तर नाही पण...
देशात काही दिवस जी स्थिती होती त्यावर तुझं मत काय? यावर 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर म्हणाली, "जे काही सुरु होतं त्यात मी म्हणणार नाही की भीती होती पण थोडी अस्थिरता नक्कीच जाणवली. जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा अनेक नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागतात. ज्यांची काहीही चूक नसते, ज्यांचा यामध्ये सहभाग नसतो त्यांना हे सहन करावं लागतं हे दुर्दैव आहे. मला मनापासून असं वाटतं की युद्ध हे कशाचंही उत्तर नक्कीच नाही मात्र काही लोकांना सरळ भाषा कळत नाही. काही लोक म्हणजे पाकिस्तान. त्यांना स्पष्ट भाषा कळत नाही अशा परिस्थितीत काही पावलं उचलावी लागतात. मला यासाठी आपल्या भारतीय सैन्याचा, सरकारचा अभिमान वाटतो. ते खूप चांगलं काम करत आहेत. या सगळ्यात ज्यांना याचे परिणाम भोगावे लागले त्यांच्यासोबत आपल्या सर्वांच्या प्रार्थना आहेत. तसंच या परिस्थितीवर आपण लवकर उपाय शोधू अशी आशा आहे. हे एकदाचं संपलं पाहिजे."
"अशा गोष्टी नक्कीच दीर्घकाळ भावनिक प्रभाव पाडतात. आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य जगताना अशा गोष्टींचा सामना करणं शिकलं पाहिजे. लोक यातून शांतीच्या मार्गाने बाहेर पडतील अशी आशा आहे. शेवटी शांती हेच आपलं ध्येय आहे."
पाक कलाकारांवर बंदी घालणं योग्य वाटतं का?
सई म्हणाली, "मला वाटतं या सगळ्यापासून कला ही वेगळी ठेवली पाहिजे. कलेची वेगळी भाषा आहे. त्यात ना कोणते अडथळे असतात ना सेन्सॉर. पण आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे आणि हा आयुष्याचाच भाग आहे. मी खूप आशावादी व्यक्ती आहे. त्यामुळे हे सगळं संपलं की आपोआप त्यासोबतच्या गोष्टीही संपतील अशी आशा आहे. कला आणि कलेशी संबंधित सर्व गोष्टी स्वतंत्र सोडल्या पाहिजे."