Vivek Agnihotri on India Pakistan Ceasefire Strategy: २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. यानंतर दोन्ही देशांत युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम लागू झाला. युद्धविराम लागू झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या. देशात आणि सीमारेषेवर तणावाचं वातावरण असतानाच प्रसिद्ध चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विवेक अग्निहोत्रींनी 'महाभारत' आणि 'चाणक्य नीती' दाखला देत, युद्ध ही केवळ रणभूमीतच नाही, तर मनातही लढली जातात, असे ठाम मत व्यक्त केलंय. विवेक अग्निहोत्री म्हणाले, "महाभारत आणि चाणक्य यांनी शिकवलंय, की युद्ध केवळ तलवारीने नाही तर संयमाने जिंकता येतं. जास्त बोलणं हे संकल्प कमकुवत करतं, योजना उघड करतं आणि एकता खिळखिळी करतं.. खरी शक्ती शिस्तबद्ध शांततेत असते किंवा उद्देशपूर्ण भाषणात असते".
तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत लिहिलं,"काल भारत-पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम हा एक विराम नव्हे, तर ते एक मानसिक पुनर्संतुलन आहे. संयम जेव्हा धोरणात्मक असतो, तेव्हा तो चिथावणीपेक्षा अधिक प्रभावी असतो. आपल्या ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी, न बोललेली गोष्टच सर्वात प्रभावी विधान ठरते आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा चांगलं कोण जाणतं?", या शब्दात त्यांनी मोदींचं कौतुक केलं.
विवेक अग्निहोत्रींची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तर काहींनी संयम आणि स्पष्ट धोरण यामधील संतुलनाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?
"शांततेचा काळ संपला आहे. आता प्रत्येक गोळीला शक्तीच्या वादळाने उत्तर दिलं जाईल. हा नवीन भारत आहे. आमच्या शूर जवानांचे आभार", असं त्यांनी म्हटलं होतं.