प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती(Suchitra Krishnamoorthi)ला अहमदाबादमधील विमान अपघातावर पोस्ट करणं महागात पडलं आहे. ट्रोल झाल्यानंतर युटर्न घेत अभिनेत्रीला माफी मागावी लागली. खरेतर सुचित्रा कृष्णमूर्तीने अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव वाचलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना खोटेरडे म्हटले आहे. अभिनेत्री म्हणाली की, विश्वास कुमार खोटे बोलले आहेत की ते अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात होते. यामुळे सुचित्रा कृष्णमूर्ती टीकेच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी वाचले आहेत. त्यामुळे हा एक चमत्कार मानला जात आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. १२ जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात २७० जणांना आपला जीव गमवावा लागला. फक्त विश्वास कुमार रमेश वाचले. पण सुचित्रा कृष्णमूर्तीने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलेच धारेवर धरले. वाद वाढताच सुचित्राला तिची पोस्ट डिलीट करावी लागली.
सुचित्रा कृष्णमूर्तीने एक्स अकाउंटवर लिहिले की, 'तर हे विश्वास कुमार रमेश विमानात प्रवासी असल्याचे आणि एकमेव वाचलेले असल्याचे खोटे बोललेत? हे खरोखरच विचित्र आहे. युकेमधील त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कथेची पुष्टी केली नाही का? त्याच्या भावाच्या अंत्यसंस्काराचे काय, ज्यामध्ये तो शवपेटी घेऊन जाताना दिसला होता?' सुचित्राने पुढे लिहिले की, जर हे खरे असेल तर विश्वास कुमार रमेश कठोर शिक्षेस पात्र आहेत. किंवा त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवले पाहिजे.
अभिनेत्रीने डिलिट केलं ट्विटयावर अनेक युजर्सनी सुचित्रा कृष्णमूर्तीला लक्ष्य केले आणि तिला चांगलेच सुनावले. युजर्स आणि अनेक पत्रकारांनी सुचित्रा कृष्णमूर्तीला सांगितले की, अहमदाबादमधील रुग्णालयानेच विश्वास कुमार एअर इंडियाच्या विमानात असल्याची पुष्टी केली आहे आणि ते मीडियामध्येही प्रकाशित झाले आहे. हे पाहून सुचित्रा कृष्णमूर्तीने ते ट्विट डिलिट केले. मात्र, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अभिनेत्रीने मागितली माफीयानंतर सुचित्राने एक नवीन ट्विट केले, ज्यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली. तिने लिहिले, 'एअर इंडिया विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीबद्दलचे माझे शेवटचे ट्विट डिलीट केले. असे दिसते की खोटी बातमी पसरवली गेली, देवालाच माहित आहे. मी माफी मागते.' सुचित्रा म्हणाली की, ती चुकीची माहिती तिच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियावर शेअर केली होती. तिला खूप वाईट वाटते की तिने ती चुकीची माहिती पुन्हा पोस्ट केली आणि त्याची पडताळणीही केली नाही.