गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर, पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) चर्चेत आहे. 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये वादग्रस्त कमेंट केल्यामुळे रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण शांत होतंय तोच रणवीरच्या नवीन वक्तव्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. रणवीरने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने सध्या भारत-पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे, त्याविषयी पाकिस्तानची माफी मागितल्याने रणवीरवर नेटकरी चांगलेच भडकलेले दिसले. काय म्हणाला रणवीर?
रणवीरने मागितली पाकिस्तानची माफी
रणवीरने सोशल मीडियावर पाकिस्तानची माफी मागणारी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तो लिहितो की, "माझ्या प्रिय पाकिस्तानी मित्र-मैत्रिणींनो, मी जे म्हणेल त्यासाठी मला अनेक भारतीयांकडून नाराजी सहन करावी लागेल. पण हे सांगणं गरजेचं आहे. अनेक भारतीयांप्रमाणे माझ्याही हृदयात तुमच्याविषयी काही द्वेष नाही. आमच्यापैकी अनेक लोकांना शांती हवी आहे. तुमचा देश सरकार चालवत नाही. तुमची लष्करी सेना आणि गुप्तचर यंत्रणा (ISI) तुमचा देश चालवते. या दोन खलनायकांनी स्वातंत्र्यानंतर तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप नुकसान पोहोचवलं आहे."
रणवीर पुढे लिहितो की, "तुमच्या या दोन यंत्रणा भारतात वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्लांना जबाबदार आहेत. तुम्हाला जर असं वाटतं असेल की, आम्ही द्वेष पसरवत आहोत तर त्यासाठी मनापासून माफी मागतो." रणवीरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलंय की, "तू तुरुंगात होतास तेच ठीक होतास." आणखी एका यूजरने लिहिलंय की, "तू पाकिस्तानात जाऊनच राहा." एका युजरने कमेंट केली की, "पोस्ट डीलीट का केली? आता भीती वाटतेय का? याला अनफॉलो करा", अशा शब्दात रणवीरला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. रणवीरने नंतर ही पोस्ट डीलीट केली.
अशाप्रकारे रणवीरने नवीन वाद ओढवून घेतला. दरम्यान इंडियाज गॉट लेटन्टच्या वादानंतर रणवीर अलाहबादियानं कमबॅक केलं आहे. रणवीरनं 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधल्या वाद-विवादानंतर काहीच दिवसांपूर्वी आपलं पहिलं पॉडकास्ट युट्यूब चॅनल टीआरएस चॅनलवर शेअर केलं आहे. यामध्ये रणवीर अलाहाबादिया बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी चर्चा केली आहे. याशिवाय काहीच दिवसांपूर्वी रणवीरच्या पॉडकास्टमध्ये अभिनेता इमरान हाश्मी येऊन गेला.