काहीच दिवसांपूर्वी IPL 2025 ची फायनल पार पडली. या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किग्ज संघाला ७ धावांनी हरवत IPL ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. संपूर्ण हंगामात PBKS ने चांगली खेळी करुन सर्वांचं कौतुक मिळवलं. परंतु फायनलमध्ये हरल्याने PBKS संघातील सर्व खेळाडूंना वाईट वाटणं साहजिक आहे. अशातच PBKS संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून, तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रिती झिंटा PBKS संघाबद्दल काय म्हणाली
प्रीती झिंटाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितलंय की, "असा शेवट व्हावा असं आपल्यापैकी कोणालाच वाटलं नव्हतं. पण संपूर्ण प्रवास भारी होता. हा प्रवास उत्कंठावर्धक, प्रेरणादायी आणि मनोरंजक होता. आपल्या तरुण संघाने, आपल्या 'वाघां'नी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली जिद्द आणि लढण्याची वृत्ती मला फार आवडली. आपल्या कर्णधाराने, आपल्या ‘सरपंचा’ने पुढे येऊन केलेलं नेतृत्व वाखाणण्याजोगं होतं. यंदाच्या आयपीएलमध्ये अनकॅप खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली, हे पाहून आनंद झाला."
"या वर्षीचा हंगाम खूपच वेगळा होता. आम्ही अनेक रेकॉर्ड्स मोडले, तेही त्या वेळी जेव्हा आमचे काही महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे आणि त्यांच्या देशातील क्रिकेटच्या जबाबदाऱ्यांमुळे खेळू शकले नाहीत. स्पर्धा काही काळ थांबली, घरच्या सामन्यांचे स्थलांतर इतर राज्यांमध्ये केलं, एकदा स्टेडियम देखील रिकामं करावं लागलं! तरीही आम्ही परिस्थितीशी जुळवून घेतलं, दहा वर्षांनंतर गुणतालिकेत आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो आणि अंतिम फेरीत शेवटपर्यंत झुंज दिली."
"पंजाब किंग्जच्या प्रत्येक खेळाडूचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांनी पूर्ण स्पर्धेत असामान्य आत्मविश्वास आणि उत्तम स्वभावाचे दर्शन घडवले. आमच्या सपोर्ट स्टाफ आणि PBKS च्या संपूर्ण टीमचं मन:पूर्वक आभार. आणि सर्वात विशेष म्हणजे, आमचे चाहते, तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार! तुम्ही आम्हाला नेहमी साथ दिलीत. सुखदु:खात, प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आमच्यासोबत होता. आज आम्ही जे काही आहोत, जिथे पोहोचलो आहोत, ते सर्व तुमच्यामुळेच."
'मी वचन देते.. आम्ही परत येऊ आणि आम्ही हे काम पूर्ण करू! कारण सध्या हे काम 'अर्धवट' आहे. पुढच्या वर्षी स्टेडियममध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. Love you all"