अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) पूर्व पती संजय कपूर यांचं काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झालं. तिला संजय यांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करिश्माने पती संजय आणि त्यांच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. तसंच संजय यांच्यावरही तिने अनेक दावे केले होते. लग्नानंतर १३ वर्षांनी २०१६ साली त्यांचा घटस्फोट झाला होता. पण तुम्हाला माहितीये का संजय कपूर यांच्याआधी करिश्मा आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा साखरपुडा झाला होता. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत का पोहोचू शकलं नाही यावर स्वत: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीच प्रतिक्रिया दिली होती.
२०१५ साली करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये अमिताभ बच्चन म्हणालेले की, "तो एक नाजुक क्षण होता. नाती बनतात, नाती तुटतात. कोणाही तरुणासाठी हे दु:खदच आहे आणि साहजिकच कुटुंबासाठीही तो दु:खद क्षण होता. असं कोणासोबतही होऊ नये. मात्र जर दोन जणांनी एकत्र यावं अशी परिस्थितीच नसेल तर त्यांनी आपापला रस्ता निवडणं योग्य आहे. आमच्याकडेही तेच झालं."
ते पुढे म्हणाले की, "माझ्या वडिलांनी मला पूर्वीच एक गोष्ट शिकवली जी आजही आम्ही सगळे पाळतो. मनासारखं झालं तर चांगलं आणि नाही झालं तर अजूनच चांगलं. मग ते देवाच्या इच्छेने होतं आणि देव तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही."
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. जया बच्चन यांनी तर जाहीरपणे करिश्माला होणारी सून असं संबोधलं होतं. करिश्माली बच्चन कुटुंबात जाण्यासाठी आतुर होती. मात्र काही महिन्यांनी अचानक त्यांचा साखरपुडा मोडल्याची बातमी आली. दोन्ही कुटुंबांनी कधीच यामागचं कारण समोर आणलं नाही.