Sridevi And Akshay Kumar : 'मिस हवाहवाई' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी यांची (Sridevi) लोकप्रियता अजूनही कायम आहे. अभिनेत्री श्रीदेवी या बॉलीवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. दमदार अभिनय, निखळ सौंदर्य, आणि नृत्याविष्काराने श्रीदेवी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रीदेवी यांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) 'मेरी बिवी का जवाब नही' या चित्रपटात एकत्र काम केलं. पंकज पराशर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. २००४ मध्ये हा सिनेमा जगभरात प्रदर्शित करण्यात आला. परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारस यश मिळालं नाही. शिवाय या चित्रपटातील श्रीदेवी आणि अक्षय कुमार यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक पंकज पराशर यांनी या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला.
अलिकडेच पंकज पराशर यांनी सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत 'मेरी बिवी का जवाब नहीं' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला. अक्षय कुमारने या चित्रपटात पहिल्यांदाच श्रीदेवी यांच्यासोबत स्क्रीन केली. त्यावेळी नवोदित कलाकार म्हणून अभिनेत्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यादरम्यान शूटिंगवेळी श्रीदेवी अभिनेत्यावर नाराज झाल्या होत्या. दरम्यान, या मुलाखतीत पंकज पराशर म्हणाले, "अक्षय कुमार एक सरळ आणि चांगली व्यक्ती आहे. तो रोज सकाळी ५ वाजता उठायचा आणि मला सुद्धा उठवायचा. त्यानंतर तो मला डोंगराळ भागात फिरायला घेऊन जायचा आणि आम्ही योग करायचो. अक्षय मला योगआसनांचे प्रकार शिकवायचा आणि योग करण्यास मोटिव्हेट करायचा. त्याच्यामध्ये खूपच एनर्जी होती."
त्यानंतर पंकज पराशर म्हणाले, "श्रीदेवीसोबत काम करताना तो घाबरला होता. त्यावेळी श्रीदेवी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या की त्याच्याकडून सराव करून घ्या. जवळपास ६ वेळा त्याने टेक घेतले आहेत. तो एक न्यायालयीन सीन होता. शिवाय त्याच्यामध्ये खूप मोठे डायलॉग्ज बोलायचे होते. जर मी तो सीन कट केला असता तर अक्षयचा आत्मविश्वास कमी झाला असता. पण,तो सीन अक्षयने व्यवस्थित पूर्ण केला आणि सेटवरील प्रत्येकाने त्याच्यासाठी टाळ्या वाजवला." असा खुलासा त्यांनी केला.