Join us  

'ए कालू..'; आजही रंगावरुन उडवली जाते आशिष विद्यार्थी यांची खिल्ली; भावुक होऊन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 9:56 AM

Ashish vidyarthi: लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव कायम आवर्जून घेतलं जातं. मात्र, त्यांच्या रंगावरुन बऱ्याचदा त्यांना ट्रोल व्हावं लागतं.

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यातील अनेक कलाकारांना बॉडी शेमिंग, वर्णद्वेष यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. यातलाच एक अभिनेता म्हणजे आशिष विद्यार्थी(ashish vidyarthi). एका मुलाखतीमध्ये आशिष यांनी त्यांना रंगावरुन कसं ट्रोल केलं गेलं यावर भाष्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केलं. हे लग्न बरंच चर्चेत राहिलं. आशिष विद्यार्थी यांनी साऊथसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव कायम आवर्जून घेतलं जातं. मात्र, त्यांच्या रंगावरुन बऱ्याचदा त्यांना ट्रोल व्हावं लागतं. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.

आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचंही झालंय पहिलं लग्न; एका मुलीची आहे आई

 "मी दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झालो. तेव्हा लोक माझ्या रंगावरुन माझी खिल्ली उडवायचे. मला एक गोष्ट माहितीये की मी सगळ्यांची तोंड बंद करु शकत नाही. त्यावेळी लोक मला माझ्या नावाऐवजी रंगावरुनच हाक मारायचे. आताच्या काळात या गोष्टीला चुकीचं म्हटलं जातं. मात्र, त्या काळात रंगावरुनच मला हाक मारली जायची", असं आशिष म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मला असं वाटतंय की लोक शिवी म्हणूनच मला त्या नावाने हाक मारायचे. हो मी आहे काळा. तुम्ही माझा रंग मला शिवी म्हणून वापरताय. पण, मला यात कोणतीही शिवी वाटत नाही हे मला स्वत:ला समजावं लागलं. लोकांनी मला त्या नावाने हाक मारली की मला वाईट वाटलं. पण, एक ना एक दिवस मला लोक चांगल्या नावाने हाक मारतील याची मी वाट पाहत राहिलो. मला अनेक जण काळू, काळू या नावाने चिडवायचे. विशेष म्हणजे मला चिडवणारे माझे मित्रच होते. पण, लोकांना काय बोलायचंय ते बोलू देत त्यांच्यावर तेच संस्कार झाले असतील असं मी समजायचो."

दरम्यान, आशिष विद्यार्थी हे कलाविश्वातील नावाजलेली व्यक्ती आहेत.आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या आहेत. अलिकडेच ते त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. 

टॅग्स :आशिष विद्यार्थीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडTollywood