Join us

सिनेमाच्या सेटवर आग लागल्याने होरपळून ६२ लोकांचा मृत्यू, अभिनेता १३ महिने रुग्णालयात, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:55 IST

बॉलिवूड सिनेमांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जीवीतहानी मानली जाते. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या

एका बॉलिवूड सिनेमाच्या सेटवर मोठी आग लागून ५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. इतकंच नव्हे तर सिनेमातील प्रमुख अभिनेता तब्बल १३ महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात घडलेली भयानक घटना म्हणून याकडे पाहिलं जातं. हा सिनेमा आहे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'. ३५ वर्षांपूर्वी या सिनेमाच्या सेटवर ही घटना घडली होती. ती आठवून आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. काय घडलं होतं नेमकं?

आगीत होरपळून अनेक लोकांचा मृत्यू

ही घटना ८ फेब्रुवारी १९८९ मधील. 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. मैसूर येथील प्रिमिअर स्टुडिओमध्ये या ऐतिहासिक सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. सिनेमाच्या सेटवर आग विझवण्याची कोणतीही उपकरणं नव्हती. अशातच सिनेमाच्या सेटवर एक वायर लूज पडल्याने भलीमोठी आग लागली. सेटवर धूर बाहेर जाण्याचीही जागा नव्हती. त्यामुळे आगीचा भडका झाला. सिनेमाच्या सेटवर मोठ्या लाईट्स आणि इतरही उपकरणं होती. त्यामुळे आग कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. या भयानत घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाली.

या आगीत होरपळून तब्बल ६२ लोकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नव्हे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' सिनेमातील मुख्य अभिनेता संजय खान हे आगीत भाजला गेले. त्यामुळे संजय यांना तब्बल १३ महिने हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. अभिनेत्यावर सर्जरीही करण्यात आली. मृतांच्या कुटुंबांना त्यावेळी ५ हजार रुपये देण्यात आले. अशाप्रकारे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या सिनेमाच्या सेटवर ही घटना घडली होती. बॉलिवूडच्या इतिहासात सेटवर इतकी मोठी जीवितहानी घडल्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. 

टॅग्स :संजय खानबॉलिवूडआगअग्निशमन दलमृत्यू