विदर्भाने पहिल्यांदाच कोरले रणजी ट्रॉफीवर आपले नाव

विदर्भाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीवर मात करत इतिहास रचला आहे. विदर्भाने दिल्लीवर ९ विकेट्सने विजय मिळवला आणि पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

दिल्लीने विदर्भाला दुसऱ्या डावात फक्त २९ धावांचे आव्हान दिले होते जे विदर्भाने एका बळीच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. विदर्भाचा अनुभवी फलंदाज वासिम जाफरने एका षटकात ४ चौकार खेचत विदर्भाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले

विदर्भाने दिल्लीला दुसऱ्या डावात २८० धावांवर सर्वबाद केले. दिल्लीकडून ध्रुव शोरे(६२) आणि नितीश राणा(६४) यांनी चांगली कामगिरी केली या दोघांनीही अर्धशतके झळकावली होती.

उपांत्य सामन्याप्रमाणेच या वेळीही रजनीश गुरबानीने विदर्भाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याने पहिल्या डावात घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांवरच आटोपण्यात यश मिळवले होते. गुरबानीने या सामन्यात एकूण आठ बळी घेतले आहेत.

विदर्भाने या सामन्यात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करताना पहिल्या डावात २५२ धावांची आघाडी मिळवली होती. त्यांनी पहिल्या डावात ५४७ धावांचा डोंगर उभा केला होता. विदर्भाकडून पहिल्या डावात अक्षय वाडकरने १३३ धावांची शतकी खेळी केली होती.