विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली

'त्या' सामन्यानंतर विराटचे ग्रह फिरले; दोन मोठ्या खेळाडूंनी थेट बीसीसीआयकडे नोंदवली तक्रार

वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे पहिलंवहिलं जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. याच सामन्यानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद धोक्यात आलं.

इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाला. न्यूझीलंडनं हा सामना सहज जिंकला. या सामन्यात दोन्ही डावांत भारताची फलंदाजी लौकिकाला साजेशी झाली नाही. यानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.

न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर विराटनं अप्रत्यक्ष संघातल्या दोन खेळाडूंच्या फलंदाजीवर टिप्पणी केली. धावा करण्याची मानसिकता असायला हवी आणि धावा करण्याचे मार्ग शोधायला हवेत, असे शब्द त्यावेळी कोहलीनं वापरले होते. कोहलीनं ज्या दोन खेळाडूंबद्दल हे उद्गार काढले, त्याच खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे त्याची तक्रार केली.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली. या सामन्यात रहाणेनं ६४ (पहिल्या डावात ४९, दुसऱ्या डावात १५) धावा केल्या. तर पुजाराला केवळ २३ (पहिल्या डावात ८, दुसऱ्या डावात १५) धावाच करता आल्या.

न्यूझीलंडनं ८ गडी राखून भारताचा पराभव केला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं रहाणे आणि पुजारावर अप्रत्यक्ष टीका केली. 'तुम्ही बाद होण्याची फार चिंता करू शकत नाही. कारण त्यामुळे गोलंदाज तुमच्यावर वरचढ ठरतो,' अशा शब्दांत कोहलीनं संघातल्या दोन वरिष्ठ खेळाडूंवर अप्रत्यक्ष शरसंधान साधलं होतं.

न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, रहाणे आणि पुजारांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रुममधील वर्तनाबद्दल जय शाह यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विराटच्या कर्णधारपदाबद्दलही चर्चा केली. त्यानंतर बीसीसीआयमध्ये हालचाली सुरू झाल्या.

दोन वरिष्ठ खेळाडूंनी तक्रार केल्यानंतर बीसीसीआयनं अन्य खेळांडूकडे फीडबॅक मागितला. दौरा पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय याच हालचालींशी संबंधित असू शकतो.

तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवत असल्यानं फलंदाजीवर फारसं लक्ष देता येत नसल्याचं विराटनं सांगितलं. त्यामुळेच टी-२०चं कर्णधारपद सोडत असल्याचं विराटनं जाहीर केलं. मात्र यामागे इंग्लंडमध्ये झालेल्या तक्रारीचा हात असल्याचं सांगितलं जातं.

Read in English