मिताली राजनं जिंकलं मन! गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांना करतेय भरघोस मदत

कोरोना प्रादुर्भावामुळे देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यात गरजूंना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे देखील आले. मदत करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूचाही समावेश झाला आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक क्षेत्रातील नागरिकांना खूप मोठा फटका बसतोय. अनेकांचे तर दोनवेळच्या जेवणाचे हाल झाले आहेत. यात देशातील अनेक सेलिब्रिटी, खेळाडू पुढाकार घेऊन आपापल्या पातळीवर मदत करत आहेत. यात आता भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचाही समावेश झाला आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाची दमदार खेळाडू मिताली राज गेल्या वर्षभरापासून गरजू रिक्षाचालकांना सढळहस्ते मदत करत आहे.

मिताली राज हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. मिताली राजनं गेल्या वर्षभरापासून रिक्षाचालकांना मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. यात तिच्या अनुपस्थितीत तिचे वडील तिचं कार्य सुरू ठेवत आहेत.

आपल्या अनुपस्थितीत वडील मदतीचं कार्य सुरू ठेवत असल्याचा आनंद मितालीनं सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. रिक्षाचालकांना आर्थिक मदतीसह रेशन म्हणजेच तांदुळ, गहू आणि इतर खाद्यपदार्थांचं वाटप केलं जात आहे.

"कोरोनाच्या संकटात गरजूंना मदत व्हावी या उद्देशानं माझे वडील रिक्षाचालकांना आर्थिक आणि रेशन स्वरुपात मदत करत आहेत. गेल्या वर्षापासून हे मदतकार्य मी सुरू केलं आणि माझ्या अनुपस्थितीत माझे वडील हे काम पुढे नेत आहेत", असं मितालीनं म्हटलं आहे.

मिताली राज हिचे वडील रिक्षाचालकांना मदत म्हणून किराणा सामान देत असल्याचं छायाचित्रांमध्ये दिसून येतं.

लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षाचालकांची गैरसोय झाली आहे. धंदा बुडाल्यानं अनेकांवर रिक्षा विकण्याचीही वेळ आली आहे. हे कळताच मितालीनं गेल्या वर्षभरापासून गरजू रिक्षाचालकांना मदत करण्याचा वसा घेतला आहे.

मिताली राजनं घेतलेल्या पुढाकाराचं सर्वस्तरातुन कौतुक केलं जात आहे. तिच्या परिसरातील रिक्षाचालक देखील मितालीचे आणि तिच्या वडिलांचे ऋणी असल्याचं सांगतात.