IPL 2021: 'सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली'

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) एकाच आठवड्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आणि भारतीय क्रिकेटला धक्का दिला. कोहलीच्या याच घोषणेवर आता टीका होऊ लागली आहे.

विराट कोहलीनं टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काल कोहलीनं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचं यंदाचं शेवटचं वर्ष असेल असं जाहीर केलं. पुढच्या सीझनपासून कोहली आरसीबीचंही नेतृत्त्व करणार नाही.

आपल्यावरील भार हलका करण्यासाठी टी-२० चं कर्णधारपद सोडत असल्याचं स्पष्टीकरण कोहलीनं दिलं आहे. कर्णधारपदावरुन पायऊतार होत असलो तरी संघातील खेळाडू म्हणून यापुढील काळात खेळत राहणार असल्याचं कोहलीनं स्पष्ट केलं आहे.

आरसीबीच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होत असलो तरी जोवर आयपीएल खेळतोय तोवर फक्त आरसीबीकडूनच खेळत राहणार असल्याचंही कोहलीनं काल स्पष्ट केलं आहे.

कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या कोहलीच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी एक वेगळाच दावा केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील ५१ शतकांचा विक्रम मोडण्यासाठीच कोहलीनं टी-२० क्रिकेटमधून कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे, असं ब्रॅड हॉग यांनी म्हटलं आहे.

क्रिकेट विश्वात आपली गणना महान खेळाडूंमध्ये व्हावी यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा पायंडा घालणं गरजेचं असल्याचं कोहली समजलं आहे. क्रिकेट विश्वात आपलं नाव अजरामर करण्यासाठीच कोहलीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं हॉग म्हणाले.

कोहलीच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्यामागे एक मोठी कहाणी आहे. तो केवळ कुणाच्या दबावापोटी असा निर्णय घेतोय असं अजिबात वाटत नाही, असंही हॉग म्हणाले.

कोहलीनं टी-२० प्रकारात भारतीय संघाचं आणि आरसीबीचंही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तो आता कसोटी क्रिकेटकडे जास्त लक्ष देऊ इच्छितो हे यातून स्पष्ट दिसून येतं. वनडे आणि कसोटीत त्याला संघाचं नेतृत्त्व करायचं आहे. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच लक्ष्य आहे की जे त्याला गाठायचं आहे असं वाटतं, असं हॉग त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात म्हणाले आहेत.

सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्याचं त्याचं लक्ष्य आहे. ते गाठता यावं हे देखील यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. वनडेमध्ये कोहली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. कोहलीच्या नावावर ४३ शतकं जमा झालेली आहेत. पण कसोटीत कोहलीच्या नावावर अद्याप २७ शतकं आहेत.

सचिननं २०० सामन्यांमध्ये ५१ शतकं ठोकली आहेत. माझ्या मतानुसार कोहलीला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. जेणेतरुन सचिनचा ५१ शतकांचा विक्रम त्याला मोडीस काढता येईल. त्याला एक महान खेळाडू बनायचं आहे आणि त्यादृष्टीनंच वाटचाल करण्याची त्याची भूमिका दिसते आहे, असंही हॉग म्हणाले.

Read in English