IND vs WI 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारवरील विश्वास उडाला?, रोहित शर्माने सांगितले २०वे षटक आवेश खानला का दिले

India vs West Indies 2nd T20I Live Updates : वेस्ट इंडिजने संघाने जबरदस्त कामगिरी करताना दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma) एक निर्णय चुकला अन् विंडीजने तिथेच पुनरागमन केले.

India vs West Indies 2nd T20I Live Updates : वेस्ट इंडिजने संघाने जबरदस्त कामगिरी करताना दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह विंडीजने पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. हा सामना टीम इंडियाने जिंकला असता, परंतु कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma) एक निर्णय चुकला अन् विंडीजने तिथेच पुनरागमन केले.

भारतीय फलंदाजांनी आज निराश केले. ओबेड मॅकॉयच्या भेदक माऱ्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली आणि भारताला १३८ धावांवर गुंडाळले. पण, भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही विंडीजला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात १० धावांची गरज असताना रोहितने चेंडू भुवनेश्वर कुमारकडे न देता आवेश खानला गोलंदाजीला बोलावले अन् दोन चेंडूंत विंडीजने निकाल लावला.

रोहित शर्मा ( ० ), सूर्यकुमार यादन ( १७), श्रेयस अय्यर ( १०), रिषभ पंत ( २४) हे फलकावर ६१ धावा असताना माघारी परतले. उप कर्णधार हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीने ४३ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने ही जोडी तोडताना हार्दिकला ३१ धावांवर बाद केले. जडेजाने २७ धावांवर मॅकॉयला विकेट दिली. भारताचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १३८ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डरने दोन विकेट्स घेतल्या.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने आक्रमक सुरुवात केली. ब्रेंडन किंग्स व कायले मेयर्स यांची ४६ धावांची भागीदारी हार्दिक पांड्याने संपुष्टात आणली. मेयर्स ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर अश्विनने कर्णधार निकोलस पूरनला १४ धावांवर माघारी पाठवले. पण, किंग्स फटकेबाजी करत होता. विंडीजने १० षटकांत २ बाद ७३ धावा केल्या होत्या.

किंग्सने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हेटमायरला ( ६) मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही अन् रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो रिटर्न कॅच देऊन बाद झाला. आवेश खानने मोक्याच्या क्षणी भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. किंग ५२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांत माघारी परतला. आता भारतीय गोलंदाजांनी फास आवळायला सुरुवात केली. अन् चेंडू व धावा यांच्यातील अंतर हळुहळू वाढवत गेले.

विंडीजला १२ चेंडूंत १६ धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगने १९व्या षटकात रोवमन पॉवेलचा ( ५) यॉर्करवर त्रिफळा उडवून विंडीजला पाचवा धक्का दिला. अर्शदीपने त्या षटकात ६ धावा देताना १ विकेट घेतली. विंडीजला ६ धावांत १० धावांची गरज होती.

२०व्या षटकात आवेश खानचा पहिलाच चेंडू नो बॉल पडला अन् फ्री हिटवर डेव्हॉन थॉमसने षटकार खेचला. ५ चेंडू २ धावा असा सामना विंडीजच्या बाजूने झुकला. थॉमसने चौकार खेचून विंडीजला विजय मिळवून दिला. विंडीजने ५ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला.

रोहित शर्मा काय म्हणाला, आम्ही पुरेशा धावा उभ्या करू शकलो नाही, फलंदाजांनी निराश केले. खेळपट्टी चांगली होती, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. पण, हे होत राहतं. जेव्हा आपण प्रयोग करतो, तेव्हा ते प्रत्येक वेळी यशस्वी होतीलच असे नाही. या चुकांतून शिकायचे असते आणि त्यात सुधारणा करायची असते.

तो पुढे म्हणाला, भुवनेश्वर कुमारने २० व्या षटकात सामना जिंकून दिला असता. पण, अशा परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी अर्शदीप सिंग व आवेश खान यांना अखेरच्या षटकांत संधी दिली. भारतासाठी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे, काय असते याचा अनुभव त्यांनाही यायला हवा. त्यांना पाठिंब्याची व संधीची गरज आहे.