जसप्रीत बुमराहचा 'सुपर-कमबॅक'! अख्तरच्या दाव्याला सणसणीत चपराक; काय म्हणाला होता, वाचा

Jasprit Bumrah Shoaib Akhtar, Ind vs Eng 2nd Test: टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची दुसरी कसोटी जिंकली. भारतीय संघाने हा सामना १०६ धावांनी जिंकला आणि त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली. टीम इंडियाच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलचा मोठा वाटा होता.

यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावले. त्याने २०९ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर इतक्या दिवस टीकेचा धनी ठरत असलेल्या शुबमन गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले.

सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड विरुद्ध भारताला विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाजाने सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेतले.

जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केल्यानंतर, त्याला या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच त्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्या टीकेला जोरदार चपराक लगावली.

गेल्या वर्षी जुलैमध्ये बुमराह जखमी झाला तेव्हा शोएब म्हणाला होता की बुमराहने पुनरागमन केले तरी तो फारसा प्रभावी ठरू शकणार नाही. बुमराहची अँक्शन फ्रंट-ऑन आहे, तो गोलंदाजी करताना पुढच्या बाजूला जास्त वजन देतो. इतरांची अँक्शन साइन-ऑन असते. बुमराहसारख्या अँक्शनचे गोलंदाज पाठीच्या दुखापतीतून बाहेर आले तर पूर्वीसारखे खेळू शकत नाहीत, असे शोएब अख्तर म्हणाला होता.

अँक्शन बॉलर्सच्या पाठीला दुखापत झाली की त्यांना आधीसारखा प्रभाव पाडणे शक्य होत नाही. त्यांना त्यांच्या शरीराचा भार व वजन सांभाळून खेळावे लागते आणि त्यामुळे चेंडू कमी वेगाने टाकावा लागतो, असेही शोएब अख्तर म्हणाला होता. पण बुमराहने ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, त्या शोएबला एका अर्थाने जोरदार चपराकच बसली आहे.