कॅण्डी, दि. 29 - भारत आणि श्रीलंकेदरम्यान पार पडलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना संतापलेल्या श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. भारताला विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता असताना हा सर्व गोंधळ सुरु झाला होता. प्रेक्षकांचा हा गोंधळ पाहून अनेकांना 1996 मधील वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्याची आठवण झाली. तो सामनाही भारत आणि श्रीलंकेदरम्यानच झाला होता. त्यावेळीही प्रेक्षकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला होता. फक्त फरक इतकाच होता की, त्यावेळी प्रेक्षक भारताचे होते. तर यावेळी हा गोंधळ श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी घातला.
जसप्रीत बुमराहचे पाच बळी आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह पाच एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने 3-0 नं खिशात घातली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील श्रीलंकेचा पराभव पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही नाराज झाले होते. त्यांनी मैदानावर बाटल्या फेकत आपला राग व्यक्त केला. भारताला विजयासाठी 8 धावांची गरज असताना हा सर्व प्रकार घडला. प्रेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला.
भारत विजयापासून फक्त ८ धावा दूर असतानाच श्रीलंकेच्या समर्थकांनी मैदानावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. त्यामुळे सामना ३५ मिनिटे थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला आणि भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या घटनेने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांत कोलकाता येथे झालेल्या उपांत्य सामन्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या वेळी भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. त्या सामन्यात श्रीलंकेला विजयी करण्यात आले होते.
धोनी मैदानातच झोपला -प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर खेळ थांबवण्यात आला होता. खेळ थांबवून प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात होता. यावेळी धोनी आणि रोहित शर्मा मैदानातच होते. परिस्थिती लवकर शांत होणार नाही हे लक्षात येताच धोनीने आपल्या कूल स्वभावाप्रमाणे मैदानातच झोप काढली. जेव्हा प्रेक्षक हुल्लडबाजी करत होते तेव्हा धोनी मैदानात मस्त झोपून आराम करत होता. त्याचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले आहेत.
1996 मधील सेमीफायनलमध्ये भारतीय प्रेक्षकांनी गोंधळ घालत केली होती जाळपोळ कोलकाता ईडन गार्डन मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान वर्ल्ड कपमधील सेमीफायनल सामना होणार होता. कर्णधार अझरुद्दीनने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र 65 धावांवर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरु झाली आणि 120 धावांवर आठ खेळाडू तंबूत परतले. आपला पराभव दिसू लागल्याने भारतीय प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांनी जाळपोळही केली होती. यानंतर आयसीसीने श्रीलंकेला विजयी घोषित केलं होतं. पराभव झाल्याने विनोद कांबळीला आपले अश्रू अनावर झाले होते.