Join us  

...त्यामुळे रुट यशस्वी ठरला : सचिन तेंडुलकर

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळपट्ट्या कोरड्या असतील तर कुलदीप उपयुक्त ठरू शकतो, असे मत भारताचा चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:04 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट चायनामन कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर यशस्वी ठरला असला तरी १ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळपट्ट्या कोरड्या असतील तर कुलदीप उपयुक्त ठरू शकतो, असे मत भारताचा चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.तेंडुलकर म्हणाला, ‘मी टीव्हीवर बघत असताना रुट कुलदीपचा चेंडू त्याच्या हाताच्या हालचालीवरून ओळखत होता. त्याचा त्याला लाभ झाला. कुलदीपच्या मनगटाची शैली बुचकळ्यात टाकणारी आहे. चेंडू सुटल्यानंतर त्याचे आकलन करणे कठीण असते. रुटने त्याच्या मनगटाची हालचाल लवकर ओळखली आणि त्याला समर्थपणे खेळण्यात यशस्वी ठरला.’भारतीय संघासाठी हे खराब संकेत आहेत का, याबाबत बोलताना तेंडुलकर म्हणाला,‘मला तसे वाटत नाही. रुटचा अपवाद वगळता इंग्लंडचे अन्य फलंदाज कुलदीपला एवढ्या समर्थपणे खेळू शकलेले नाहीत. इंग्लंडमधील सध्याचे वातावरण बघता उन्हामुळे तेथील खेळपट्ट्या कोरड्या असतील. अशा स्थितीत कुलदीपसह अन्य फिरकीपटू उपयुक्त ठरतील. खेळपट्ट्या कोरड्या व पाटा असतील तर भारतासाठी चांगली संधी राहील. खेळपट्टीवर हिरवळ असेल तर इंग्लंडचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील.’पहिल्या तीन कसोटीत भुवनेश्वर कुमारची तर पहिल्या लढतीत जसप्रीत बुमराहची भारताला उणीव भासेल, असेही सचिन म्हणाला.तेंडुलकरने सांगितले की,‘भुवनेश्वरची दुखापत भारतासाठी मोठा धक्का आहे. मला त्याच्याकडून मोठी आशा आहे. चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता बघता तो कसोटी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता. भुवनेश्वरने २०१४ च्या इंग्लंड दौºयात धावाही फटकावल्या होत्या. तो तळाच्या फळीत भागीदारी करू शकतो. तसे बघता वेगवान गोलंदाजांमध्ये आपल्याकडे पर्यायांची उणीव नाही.’बुमराहबाबत बोलताना सचिन म्हणाला,‘वन-डे मालिकेत त्याची उणीव भासली. कारण डेथ ओव्हर्समध्ये तो चॅम्पियन गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली असून ही मालिका त्याच्यासाठी चांगली संधी होती. तो दुसºया कसोटीमध्ये पुनरागमन करू शकतो.’कर्णधार विराट कोहलीचा २०१४ चा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे, पण सचिनच्या मते आगामी मालिकेत त्याचा काही फरक पडणार नाही. विराटच्या २०१४ च्या कामगिरीचा आगामी मालिकेसोबत काही संबंध नाही. विराटच का मला संघातील सर्वंच खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे, असेही सचिन म्हणाला.

टॅग्स :सचिन तेंडूलकरजो रूटभारत विरुद्ध इंग्लंड