गाले : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाचे अनेक खेळाडूंवर दडपण असते; पण हार्दिक पांड्याला मात्र आपल्या पहिल्या डावात ‘वन-डे’ सामना खेळत असल्याचे वाटत होते.
पांड्याने ४९ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली आणि भारताने वेगाने ६०० धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यात अतिरिक्त
वेळ मिळाला.
पांड्याला पदार्पणाच्या कसोटीच्या तयारीबाबत विचारले असता तो म्हणाला,‘फलंदाजी करीत असताना मला वन-डेमध्ये खेळत असल्याचे वाटत होते. माझ्यासाठी स्थिती अनुकूल होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून तयारी करताना स्मार्ट होण्याची गरज असते. स्वरूपामध्ये बदल झाला तर मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज असते, पण एकूण विचार करता तंत्रामध्ये बदल होत नसतो.’
पांड्याने गांभीर्याने विचार केला नसला तरी त्याला युवराज सिंगप्रमाणे एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम करण्याची इच्छा आहे.
त्याचा सिनिअर असलेल्या चेतेश्वर पुजाराला असे वाटते की,
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरू शकतो. (वृत्तसंस्था)