Join us  

India Vs England, Latest News : भारत-इंग्लंड लढत आणि 338 धावांचा अजब योगायोग!

भारत आणि इंग्लंडचे संघ याआधी जेव्हा 2011च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते तेव्हा दोन्ही संघांनी प्रत्येकी 338 धावा बनवल्या होत्या.

By बाळकृष्ण परब | Published: June 30, 2019 7:28 PM

Open in App

बर्मिंगहम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषकातील सर्वात हायहोल्टेज लढतींपैकी एक असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढत बर्मिंगहम येथे सुरू आहे. या लढतीत इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत 337 धावा कुटत भारतासमोर 338 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील एका अजब योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे भारत आणि इंग्लंडचे संघ याआधी जेव्हा 2011च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते तेव्हा दोन्ही संघांनी प्रत्येकी 338 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे ती लढत टाय झाली होती.

2011च्या विश्वचषकात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या त्या लढतीत दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर सचिन तेंडुलकरचे झंझावाती शतक आणि गौतम गंभीर आणि युवराज सिंहने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 338 धावा फटकावल्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना दीडशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने इयान बेलसह 160 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयासमिप नेले होते. पण अखेरच्या षटकांमध्ये झहीर खान आणि मुनाफ पटेल यांनी टिच्चून मारा करत सामना टाय करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे आज 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेमकं काय होतं याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलंच झोडपलं. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर भारतीय संघ जोरदार फटकेबाजी करून सर करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी भेदक मारा केला, नाहीतर इंग्लंडचा संघ चारशे धावांच्या जवळपास जाऊ शकला असता. शमीने या सामन्यात पाच बळी मिळवत इंग्लंडच्या धावसंख्येवर दबाव आणण्याचे काम चोख बजावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठवले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते. पण मैदानात आलेल्या बाराव्या खेळाडूने (रवींद्र जडेजा) सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले. 

रॉय बाद झाल्यावरही जॉनी दमदार फटकेबाजी करत होता. बेअरस्टोव हा भारतीय गोलंदाजीची पिसे काढत होता. जॉनीला बाद कसे करायचे, हा पेच कोहलीपुढे होते. त्यावेळी कोहलीने शमीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी शमीने कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. शमीने यावेळी फक्त जॉनीलाच बाद केले नाही तर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनलाही स्वस्तात तंबूत धाडले. जॉनीने यावेळी 10 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 111 धावांची खेळी साकारली.

जॉनी बाद झाल्यावर बेन स्टोक्सने इंग्लंडची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला जो रूट आणि जोस बटलर यांची साथ मिळाली. पण या दोघांनाही जास्त धावा करता आल्या नाहीत. स्टोक्सने 54 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 79 धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडवर्ल्ड कप 2019