Join us  

हैदराबादची संघनिवड शानदार

वानखेडे स्टेडियममध्ये डेव्हिड वॉर्नर व भुवनेश्वर कुमार यांच्याविना मुंबईला पराभूत करणे विशेष कामगिरी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:20 AM

Open in App

आयपीएलच्या लिलावादरम्यान सनरायझर्स हैदराबादने खेळाडूंची निवड चांगल्या पद्धतीने केली आणि त्याचा त्यांना आता लाभ होत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये डेव्हिड वॉर्नर व भुवनेश्वर कुमार यांच्याविना मुंबईला पराभूत करणे विशेष कामगिरी आहे. शिखर धवन पूर्णपणे फिट नसताना आणि बिली स्टॅनलेकला गमावल्यानंतर ही कामगिरी स्पेशल ठरते. माझ्या मते ११८ धावांचा बचाव करणे यंदाच्या मोसमातील नक्कीच सर्वोत्तम कामगिरी आहे.हैदराबादने ज्या ६ गोलंदाजांचा वापर केला. त्यापैकी तीन खरे बघता एकादशचा भाग नव्हते आणि पर्याय म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. तरी मोहंमद नबी, संदीप शर्मा आणि बासिल थम्पी यांनी ७.५ षटकांत ३६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. चांगले फुटबॉल संघ असेच तयार होत असतात. त्यात राखीवमध्ये असलेले खेळाडू मैदानात उतरून छाप पाडतात. स्टार खेळाडू महत्त्वाचे असतात; पण अनुकूल निकालासाठी प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका बजावणे आवश्यक असते.संघात केलेले बदल शानदार होते. मुंबईविरुद्ध नबीच्या स्थानी परिस्थितीनुसार ब्रेथवेटला खेळवता आले असते किंवा फलंदाजी मजबूत करण्यासाठी हेल्सचा समावेश करता आला असता. असे झाले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते. त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुरूप योग्य खेळाडूंची निवड केली. फलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी अशी लीगची ओळख निर्माण झाली असली तरी हैदराबाद संघ गोलंदाजांचे समर्थन करताना बघून चांगले वाटले. २०१६मध्ये जेतेपद पटकावणारा संघ पुन्हा त्याच दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसते. प्रामाणिकपणे सांगायचे तर वॉर्नरची उणीव भरून काढणे कठीण आहे. त्यामुळे फलंदाजी बाजू कमकुवत झाल्याचे दिसून येते. तर, संघातील उर्वरित खेळाडूंनी त्याची उणीव भरून काढण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. (टीसीएम)

टॅग्स :आयपीएल 2018