कोलकाता - ईडन गार्डन्सवरील भारत-श्रीलंकेमधील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यानंतर मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. दोघांना व्यक्तीगत कारणांसाठी विश्रांती हवी होती. त्यांनी निवड समिती तसेच संघ व्यवस्थापनाकडे विश्रांती देण्यासाठी विनंती देखील केली होती. भुवनेश्वरच्या जागी विजय शंकरची संघात निवड करण्यात आली आहे. शिखर धवन तिस-या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल.
भारत आणि श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामने बाकी आहेत. तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर होणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भुवनेश्वर लवकरच नुपूर नागरबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे त्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. ग्रेटर नोएडा येथे चार ऑक्टोंबरला पार पडलेल्या एका समारंभात भुवनेश्वरचा नुपूर नागरबरोबर साखरपुडा झाला. जवळचा मित्रपरिवार आणि फक्त कुटुंबिय या समारंभाला हजर होते. त्याच्या भावी वधूसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन त्याने ही माहिती दिली.
यावर्षी 11 मे ला नुपूरसोबतचा डिनर डेटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याने आपल्या नात्याची कबुली दिली. कोलकात्यात श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भुवनेश्वरने भेदक मारा करुन श्रीलंकन संघाला बॅकफूटवर ढकलेले होते. कसोटीच्या अखेरच्या दिवशी आणखी थोडा वेळ मिळाला असता तर श्रीलंकेचा पराभव अटळ होता. पण अपुरा प्रकाश श्रीलंकेच्या मदतीला धाऊन आला. त्याने या कसोटीत एकूण आठ विकेट घेतल्या. त्याने दोन्ही डावात मिळून प्रत्येकी चार गडी बाद केले.