IT Companies Shifting Strategy : गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चे सावट आता थेट भारतीय शेअर बाजारातील आयटी कंपन्यांवर दिसू लागले आहे. एआयमुळे आयटी कंपन्यांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात येईल, या भीतीने गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्सची तुफान विक्री केली आहे. गेल्या सलग ८ सत्रांमध्ये आयटी कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल ६ लाख कोटी रुपयांनी घटले असून निफ्टी आयटी निर्देशांकात ८ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
व्यवसायावर 'एआय'चे अतिक्रमण?
गुंतवणूकदारांमध्ये भीती आहे की, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मेंटेनन्स आणि टेस्टिंग यांसारखी आयटी क्षेत्रातील कामे एआय टूल्सद्वारे स्वयंचलित होतील. जर कामे एआयद्वारे होऊ लागली, तर कंपन्यांच्या महसुलावर आणि नफ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, टीसीएस आणि इन्फोसिससारख्या दिग्गज कंपन्यांचे म्हणणे आहे की, एआय त्यांच्या सेवा संपवणार नाही, तर त्या अधिक कार्यक्षम करेल.
ब्रोकरेज संस्थांचे संमिश्र सूर
आयटी क्षेत्राच्या भविष्याबाबत जागतिक ब्रोकरेज संस्थांमध्ये दोन गट पडले आहेत. जेपी मॉर्गनच्या मते, एआय आयटी कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण करेल. एचएसबीसीचा अहवाल सांगतो की, एआय सध्याच्या बिझनेस मॉडेलचाच भाग बनेल, जिथे आयटी सेवा पुरवठादारांची भूमिका महत्त्वाची राहील. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने मात्र धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, पुढील ३ ते ४ वर्षांत एआयच्या वापरामुळे आयटी क्षेत्राच्या महसुलात ९ ते १२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
एआय 'मॅजिक बॉक्स' नाही!
बाजार तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही मोठ्या संस्थेत एआय स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. त्याला डेटा सिस्टम, ऑडिट चेक, सायबर सुरक्षा आणि जोखीम नियंत्रणासाठी मजबूत रचनेची गरज असते. हे सर्व व्यवस्थापित करण्यासाठी आयटी वेंडर्स आणि एंटरप्राइज प्लॅटफॉर्मची भूमिका अपरिहार्य आहे. त्यामुळे दीर्घकाळात आयटी कंपन्या या तंत्रज्ञानाचा स्वीकार किती वेगाने करतात, यावरच त्यांचे यश अवलंबून असेल.
