Israel-America-Iran War Impat On Share Market: इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी सकाळी इराणवर संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला असून अनेक शहरांना लक्ष्य केलं. यामुळे संपूर्ण मिडल ईस्टमध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये मोठी खळबळ उडाली. आता अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव (Selling Pressure) येऊ शकतो. हा तणाव भारतीय बाजारासाठी मोठा धोका ठरू शकतो, ज्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.
जर हा तणाव आणखी वाढला, तर कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढू शकतात, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामुळे तेल महागल्यास महागाई वाढू शकते आणि अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो. 'मनीकंट्रोल'च्या अहवालानुसार, विश्लेषकांनी म्हटलंय की जर इस्रायल-इराण तणाव अधिक गंभीर झाला, तर बाजारात विक्रीचा दबाव वाढेल आणि जागतिक बाजारपेठेतही भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
'Nifty 50 घसरुन १५००० पर्यंत येणार? पुढील दोन वर्ष घसरण सुरू राहणार,' कोणी केला हा मोठा दावा?
'या' कंपन्यांच्या शेअर्सवर होऊ शकतो परिणाम
भारतासाठी कच्च्या तेलाच्या किमती हा मुख्य धोका आहे. जर कच्चं तेल महागलं तर महागाई वाढेल, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे शेअर बाजारात अस्थिरता वाढू शकते. अहवालानुसार, हा तणाव अशा वेळी येत आहे जेव्हा महत्त्वाचे आर्थिक डेटा प्रसिद्ध होणार आहेत, ज्यामुळे बाजारातील चढ-उतार अधिक तीव्र होऊ शकतात.
अनेक भारतीय क्षेत्रांवर थेट परिणाम होईल
ऑईल मार्केटिंग कंपन्या: IOC, BPCL आणि HPCL सारख्या कंपन्यांवर दबाव येईल कारण त्यांचा नफा कमी होऊ शकतो.
एव्हिएशन क्षेत्र: इंधन महाग झाल्यामुळे एअरलाईन्सचा खर्च वाढेल आणि त्या प्रभावित होतील.
पेंट कंपन्या: एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्सवर परिणाम होईल कारण पेंटसाठी लागणारा कच्चा माल क्रूडवर आधारित असतो.
टायर कंपन्या: सिंथेटिक रबर हे क्रूडशी संबंधित असल्याने टायर कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात. हे सर्व सेक्टर कोसळल्यास त्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून येईल.
खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढणार? पेट्रोल-डिझेल महागणार?
भारतीय बाजार सध्या मजबूत असला तरी जागतिक भू-राजकीय जोखमीपासून वाचणं कठीण आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर संकट येऊ शकते. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' सारख्या मार्गावरून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल येतं, तिथे समस्या निर्माण झाल्यास किमती आणखी वाढू शकतात.
विश्लेषकांच्या मते, जर तणाव कमी झाला नाही तर बाजारावर दबाव वाढेल. गुंतवणूकदारांनी सावध राहून 'क्रूड सेन्सेटिव्ह' शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. जर इस्रायल आणि इराणमध्ये मोठी चकमक झाली, तर तेलाच्या किमतीत मोठी उडी पाहायला मिळू शकते. भारतासारख्या देशासाठी ही चिंतेची बाब आहे कारण आपली अर्थव्यवस्था तेलाच्या किमतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडेल, पेट्रोल-डिझेल महाग होईल आणि वाहतुकीचा खर्च वाढेल. परदेशी गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी पैसे काढून घेऊ शकतात, ज्यामुळे शेअर बाजारात घसरण होऊ शकते.
हा भू-राजकीय तणाव भारतीय गुंतवणूकदारांसाठी मोठी जोखीम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ हुशारीने व्यवस्थापित केला पाहिजे आणि जास्त जोखीम असलेल्या शेअर्सपासून सावध राहिलं पाहिजं. जर तणाव निवळला तर बाजार पुन्हा सावरू शकतो, पण सध्या तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
