Stock Market Crash: शुक्रवारी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सध्या देशांतर्गत शेअर बाजार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) होत असलेल्या सततच्या विक्रीमुळे प्रचंड दबावाखाली आहे. शुक्रवारी एफआयआयने ७,५३६ कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १२,२९३ कोटी रुपयांची खरेदी केली. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात भारतीय शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते. पुढील दोन वर्षे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता असून, निफ्टी ५० आगामी दोन वर्षांत १५,००० अंकांपर्यंत खाली येऊ शकतो.
जपानच्या मध्यवर्ती बँकेनं वाढवले व्याजदर
शेअर बाजार येणाऱ्या काळात दबावाखाली राहू शकतो. जपानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडणार आहे. १७ वर्षांनंतर जपानच्या मध्यवर्ती बँकेनं नकारात्मक दरातून वाढ करून व्याजदर २.५० टक्क्यांवर नेला आहे. यामुळे जपानच्या ट्रेझरी बॉन्ड्सच्या मागणीत वाढ होईल. जपानच्या मध्यवर्ती बँकेची पुढील बैठक १८ आणि १९ मार्च रोजी होणार असून, संपूर्ण शेअर बाजाराचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.
गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्यायांचा विचार करा
तज्ज्ञांच्या मते, जपानच्या ट्रेझरी बॉन्ड्समधील वाढीमुळे अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड्सवर दबाव वाढेल. यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होईल आणि तिथे महागाई वाढेल. या सर्व घडामोडींचा अमेरिकन शेअर बाजारावर मोठा परिणाम होईल. तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारही यापासून दूर राहणार नाही. निफ्टी ५० निर्देशांक २०२७ च्या अखेरीस १५,००० पर्यंत घसरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील दोन वर्षे शेअर बाजारासाठी आव्हानात्मक असल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
घसरण कायम राहण्याची शक्यता
'पेस ३६०' शी संबंधित अमित गोयल यांच्या मते, “या वर्षाच्या अखेरीस निफ्टी २१,००० च्या खाली जाऊ शकतो. निफ्टी ५० ला पुढील वर्षीही सातत्याने घसरणीचा सामना करावा लागेल आणि पुढील वर्षाच्या अखेरीस तो १५,००० च्या आसपास येऊ शकतो.”
