Tata Group TCS : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस साठी 'ब्लॅक थर्सडे' ठरला. आयटी शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड विक्रीमुळे टीसीएसच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे. परिणामी, खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने टीसीएसला मागे टाकत भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, कालच स्टेट बँक ऑफ इंडियाने टीसीएसला मागे टाकले होते.
बाजार भांडवलाचे नवीन समीकरण
टीसीएसच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांची घसरण झाल्याने कंपनीचे बाजार भांडवल १०.०४ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांचे भांडवल १०.२२ लाख कोटींवर पोहोचले.
भारतातील टॉप ५ मौल्यवान कंपन्या
| रँक | कंपनीचे नाव | मार्केट कॅप (अंदाजे) |
| १ | रिलायन्स इंडस्ट्रीज | १९.८ लाख कोटी |
| २ | एचडीएफसी बँक | १४.२ लाख कोटी |
| ३ | भारती एअरटेल | ११.७५ लाख कोटी |
| ४ | स्टेट बँक ऑफ इंडिया | ११.०८ लाख कोटी |
| ५ | आयसीआयसीआय बँक | १०.२२ लाख कोटी |
आयटी शेअर्समध्ये का झाली पडझड?
आयटी क्षेत्रातील या घसरणीमागे प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अमेरिकेतील आर्थिक घडामोडी कारणीभूत आहेत. एआयमुळे सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपन्यांच्या व्यवसायावर आणि कमाईवर परिणाम होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकेतील नोकऱ्यांचा अहवाल अपेक्षेपेक्षा चांगला आला असला, तरी वॉल स्ट्रीटवर भारतीय आयटी कंपन्यांच्या एडीआरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. २०२५ मध्ये निफ्टी आयटी इंडेक्स १३ टक्क्यांनी घसरला होता, तर २०२६ मध्ये आतापर्यंत हा इंडेक्स ११ टक्क्यांनी कमजोर झाला आहे.
बँकिंग क्षेत्राचे वर्चस्व वाढले
गेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता, भारतीय बाजारपेठेत बँकिंग क्षेत्राचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. टीसीएससारख्या आयटी दिग्गज कंपनीला आधी सरकारी बँक आणि आता खासगी बँकेने मागे टाकणे, हे बाजारातील बदलत्या प्रवाहाचे संकेत मानले जात आहेत.
