Friendship : तुम्ही तुमच्या मित्राला दिलेले पैसे परत मिळाले नाहीत, असा अनुभव तुम्हाला आला आहे का? एका ताज्या सर्वेक्षणानुसार, हे असे घडणारे तुम्ही एकटेच नाही. ७३% मित्र उधार घेतलेले पैसे परत करत नाहीत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचा अर्थ, तुम्ही जर तुमच्या दहा मित्रांना पैसे दिले, तर त्यापैकी फक्त २-३ जणच ते पैसे परत करण्याची शक्यता आहे, तर उर्वरित ७-८ जण ते बुडवू शकतात. मित्र-मैत्रिणींकडून पैसे घेणे सोपे वाटते. पण, हे 'सोपे' वाटणारे व्यवहार कधीकधी खूप महागात पडू शकतात.
सोशल मीडिया सर्वेक्षणातून धक्कादायक सत्य समोर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'पबिटी' (Pubity) ने केलेल्या एका सर्वेक्षणात हे गंभीर सत्य समोर आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल ७३ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मित्रांना उधार दिलेले पैसे कधीच परत मिळाले नाहीत. यामुळे अनेकदा परिस्थिती इतकी बिघडते की, मैत्रीच संपुष्टात येते. काही प्रकरणांमध्ये असेही दिसून आले आहे की, जेव्हा तुम्ही मित्राला उधार घेतलेले पैसे परत मागता, तेव्हा तो पैसे परत करतो, पण त्यानंतर मैत्रीचा विषय संपवतो. विशेषतः लहान रक्कम असल्याने, अनेकदा पैसे मागायलाही संकोच वाटतो आणि नातेसंबंध बिघडतील या भीतीने अनेकजण गप्प राहतात.
लोक पैसे परत का करत नाहीत?
मित्र पैसे परत न करण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
- गांभीर्य नसणे : बऱ्याचदा मित्र या मदतीला गांभीर्याने घेत नाहीत आणि वेळेवर परतफेड करत नाहीत.
- विसरणे: कधीकधी रक्कम इतकी कमी असते की लोक ती परत करायला विसरून जातात. 'छोटीच तर रक्कम आहे' असा विचार मनात येतो.
- जाणीवपूर्वक टाळणे: काही मित्र मुद्दामहून धूर्तपणे वागतात आणि एकदा रक्कम घेतल्यानंतर ती विसरून गेल्याचे नाटक करतात.
- नातेसंबंधाचा गैरफायदा: जवळच्या नातेसंबंधातील (उदा. मित्र, नातेवाईक) लोक पैसे घेतात, पण परत करत नाहीत. पैसे मागितल्यास नातेसंबंध बिघडतील या विचाराने समोरची व्यक्तीही गप्प बसते.
वाचा - केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
पैशांच्या व्यवहारात स्पष्टता न ठेवल्यास किंवा अवास्तव अपेक्षा ठेवल्यास मित्रत्वात कटुता येऊ शकते. त्यामुळे, मित्रांना पैसे उधार देताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास, व्यवहाराची स्पष्टता ठेवण्यासाठी लहानसा लेखी करार करणे किंवा पैसे देण्यापूर्वीच अटी व शर्ती स्पष्ट करणे हे भविष्यातील गैरसमज टाळण्यास मदत करू शकते.