Smart Investment Tips : आजकाल बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगली नोकरी करणारे अनेक तरुण आहेत, ज्यांची कमाई उत्तम आहे, पण महिन्याच्या अखेरीस त्यांच्या हातात काहीच शिल्लक नसते. पगार सुरुवातीला जमा होतो, पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँक अकाउंट रिकामे झालेले दिसते. पैसा नेमका कुठे जातोय, हे अनेक तरुणांना कळत नाही आणि बचतीचा तर पत्ताच नसतो. तुमचीही अशीच अवस्था होत असेल तर काळजी करू नका. एक नियम तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो.
'५०-३०-२०' नियम म्हणजे काय?
तुमचा पगार जास्त असो की कमी '५०-३०-२०' चा हा नियम वापरुन तुम्ही देखील श्रीमंत होण्याकडे वाटचाल करू शकता.
१. ५०% आवश्यक खर्चांसाठी
आपल्या पगाराचा पहिला आणि सर्वात मोठा हिस्सा (५०%) आवश्यक खर्चांसाठी बाजूला काढा. यात खालील गोष्टींचा समावेश होता.
- घरभाडे
- अन्न-पाणी
- वीज आणि मोबाईल बिल
- ऑफिसला येण्या-जाण्याचा खर्च
या खर्चांचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, अनेक खर्च हे गरजेमुळे नसून केवळ सवयींमुळे होत होते. अनावश्यक खर्च कमी झाल्यामुळे तुमचा ५०% हिस्सा व्यवस्थित मॅनेज होऊ लागेल.
२. ३०% जीवनशैलीसाठी, पण नियोजनाने
दुसरा हिस्सा (३०%) जीवनशैलीवर खर्च करायला ठेवा. अनेकज पगार झाला की लगेच बाहेर जेवण, शॉपिंग आणि मूव्हीजवर पैसे खर्च करतात. आता या नियमानुसार आधीच खर्चाचे नियोजन करता येईल. दरवेळी आनंदी राहण्यासाठी पैसे उडवणे आवश्यक नसते, हे तुम्हाला जाणवेल. हळूहळू, हा ३०% चा हिस्सा देखील तुमच्या नियंत्रणात येईल.
३. २०% बचत आणि गुंतवणुकीसाठी
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा हिस्सा (२०%) बचत आणि गुंतवणुकीसाठी आहे. सुरुवातीला तुम्हाला २०% रक्कम बाजूला काढणे खूप कठीण होईल. पण, नियमाप्रमाणे नियोजन केले तर महिना-दर-महिना हा हिस्सा सर्वात सोपा होतो. याच पैशातून आपत्कालीन निधी तयार करता येईल. त्यानंतर एसआयपी सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही संपत्ती वाढवू शकता.
६ महिन्यांत दिसेल 'जादू'
अवघ्या सहा महिन्यांनंतर तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट पाहिले, तर विश्वास बसणार नाही. जिथे दर महिन्याला अकाउंट झीरो दिसायचे, तिथे आता तुमच्याकडे मजबूत आपत्कालीन निधी तयार झालेला असेल. एसआयपी नियमितपणे सुरू असूनही तुमच्या जीवनशैलीवरही कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
