Adani Group Davos: दावोस येथे सुरू असलेल्या World Economic Forum (WEF) मध्ये गौतम अदानी यांनी भारतातील पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. येत्या काळात Adani Group एव्हिएशन, क्लीन एनर्जी, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तब्बल ६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
गौतम अदानींची दावोसमध्ये मोठी घोषणा
जगातील ६० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, आशियातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे भारताच्या विकास प्राधान्यांना(रोजगारनिर्मिती, ऊर्जा संक्रमण आणि उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरता) बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुंतवणूक कुठे होणार?
अदानी ग्रुपच्या मते, ही गुंतवणूक प्रामुख्याने महाराष्ट्र, आसाम आणि झारखंड या राज्यांमध्ये केली जाणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ५६ व्या वार्षिक परिषदेत सादर केलेल्या या योजनांनी भारतातील खासगी गुंतवणुकीच्या नव्या टप्प्याचे संकेत दिले आहेत.
आसाम आणि ईशान्य भारतासाठी महत्त्वाच्या घोषणा
आसाममध्ये गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्रस्थानी ठेवून एव्हिएशन आणि एअरोस्पेस इकोसिस्टम विस्तारण्याची योजना आहे. या विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये केले होते, तर त्याचे व्यावसायिक संचालन लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या अंतर्गत हॉस्पिटॅलिटी व रिटेल पायाभूत सुविधा, लेव्हल-डी फुल-फ्लाइट सिम्युलेटरसह एव्हिएशन अकॅडमी, मोठ्या व लहान विमानांसाठी MRO (देखभाल व दुरुस्ती) सुविधेमुळे गुवाहाटीला ईशान्य भारतासाठी प्रादेशिक एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचा उद्देश आहे.
याशिवाय, आसामच्या कार्बी आंगलोंग आणि दीमा हसाओ जिल्ह्यांमध्ये २,७०० मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच सिमेंट उत्पादन आणि ग्राइंडिंग युनिट्स उभारून पूर्व व ईशान्य भारतातील बांधकाम साखळी मजबूत केली जाणार आहे.
महाराष्ट्रात शहरी पुनर्विकास आणि ऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्रात अदानी ग्रुपची गुंतवणूक प्रामुख्याने मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व त्यास जोडलेले लॉजिस्टिक्स, व्यावसायिक व आतिथ्य प्रकल्प आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि पुढील पिढीच्या ऊर्जा प्रणाली यावर केंद्रित असेल.
याशिवाय ३,००० मेगावॅट क्षमतेचे ग्रीन डेटा सेंटर पार्क, ८७०० मेगावॅट पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प, कोळसा गॅसिफिकेशन उपक्रम, सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन सुविधा, खासगी सहभागावर आधारित संभाव्य अणुऊर्जा प्रकल्प यांचाही समावेश आहे.
७ ते १० वर्षांत गुंतवणूक पूर्ण होणार
अदानी एंटरप्राइजेसचे संचालक प्रणव अडानी यांनी सांगितले की, ही संपूर्ण गुंतवणूक पुढील ७ ते १० वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने केली जाईल. या प्रकल्पांचा उद्देश रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाधारित समावेशनाला चालना देणे हा आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणूकीबाबत म्हटले की, राज्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करायची असेल तर गुंतवणूक आवश्यक आहे. अदानी ग्रुप असो वा अन्य कोणीही, आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो.
