Retirement Age : भारतात निवृत्तीचे सरकारी वय ६० वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत आहे. तर खासगी क्षेत्रात हेच वय ६० वर्षांपर्यंत आहे. मात्र, नोकरीतून ६० व्या वर्षी निवृत्त होण्याची संकल्पना आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे! कारण, नुकतेच कामाला लागलेल्या तरुण पिढीने निवृत्तीबाबत एक वेगळा विचार मांडला आहे. एका नवीन अहवालानुसार, मोठ्या संख्येने तरुण (विशेषतः २५ वर्षांखालील) ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यानच काम थांबवून निवृत्त होऊ इच्छित आहेत. हा आकडा आतापर्यंतच्या प्रचलित पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
ग्रँट थॉर्नटन इंडियाच्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, २५ वर्षांखालील ४३ टक्के तरुण ४५ ते ५५ वयोगटात निवृत्त होण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर, ५६ टक्के सहभागी ५५ ते ६५ वयोगटात निवृत्त होण्याची योजना आखत आहेत, जी सध्याच्या भारतीय निवृत्ती पद्धतीशी थोडी सुसंगत आहे.
मासिक १ लाखाच्या पेन्शनची अपेक्षा, पण गुंतवणूक अपुरी!
या अहवालात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सुमारे ५५ टक्के सहभागींना निवृत्तीनंतर मासिक १ लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शनची अपेक्षा आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, फक्त ११ टक्के लोकांनाच वाटते की त्यांची सध्याची गुंतवणूक या मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. ही मोठी तफावत भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी एक आव्हान निर्माण करत आहे.
तरुणांचा 'हाय-रिस्क, हाय-रिटर्न' फंडा, सरकारचाही आधार!
अहवालानुसार, तरुण सहभागी (विशेषतः २५ वर्षांखालील ३१ टक्के) उच्च-जोखीम, उच्च-परतावा (High-Risk, High-Return) असलेल्या योजनांना अधिक प्राधान्य देत आहेत. हे त्यांच्या वाढत्या जोखीम घेण्याच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे.
यासोबतच, ३९ टक्के सहभागी सरकार-समर्थित पेन्शन योजनांना सर्वात सुरक्षित आणि पसंतीचा पर्याय मानतात. सरकारने देखील या दिशेने पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) च्या जागी आता युनिफाइड पेन्शन योजना (UPS) आणली आहे. ही नवीन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या ५० टक्के आजीवन मासिक पेन्शन, नियतकालिक महागाई सवलत (DA) वाढ आणि किमान १०,००० रुपयांच्या पेन्शनची हमी देते.
शिवाय, सरकारने एनपीएस वात्सल्य योजना देखील सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश पेन्शन खात्याद्वारे मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे आहे. अल्पवयीन मुलांना सदस्यत्व घेण्याची परवानगी देणारी ही योजना वार्षिक १,००० रुपयांपासून योगदान सुरू करण्याची सुविधा देते आणि अनिवासी भारतीयांसाठी (NRI) देखील उपलब्ध आहे.
वाचा - बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!
भविष्यासाठी मजबूत पेन्शन व्यवस्थेची गरज!
ग्रँट थॉर्नटन इंडियाचे पार्टनर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस रिस्क लीडर विवेक अय्यर यांच्या मते, "भारताची काम करणारी लोकसंख्या वाढत असताना, निवृत्तीच्या अपेक्षित गरजा आणि प्रत्यक्ष बचतीमधील अंतर वाढत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी एक मजबूत आणि सर्वांना समाविष्ट करणारी पेन्शन व्यवस्था आवश्यक आहे. अशी व्यवस्था जी व्यक्तींच्या जीवनचक्राच्या गरजांशी जुळेल आणि त्याचबरोबर भांडवल निर्मिती व आर्थिक स्थिरता यांसारख्या मोठ्या आर्थिक उद्दिष्टांनाही मदत करेल."