FII Outflow : भारतीय शेअर बाजारात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा धडाका २०२६ मध्येही कायम आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून २२,५३० कोटी रुपयांचे समभाग विकून आपला पैसा काढून घेतला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात सुट्ट्यांमुळे केवळ चार दिवस बाजार सुरू असूनही तब्बल १४,२६६ कोटींची विक्री झाली, ज्यामुळे बाजारपेठेत चिंतेचे ढग गडद झाले आहेत.
विक्रीची दोन प्रमुख कारणे
बाजार तज्ज्ञांच्या मते, परदेशी गुंतवणूकदार भारत सोडून जाण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत.
- उच्च मूल्य : भारतीय शेअर बाजार सध्या इतर उभरत्या बाजारपेठांच्या तुलनेत महाग वाटत आहे. त्यामुळे नफावसुली करण्यासाठी गुंतवणूकदारांना भारत हे सर्वात सुरक्षित ठिकाण वाटत आहे.
- रुपयाची घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने परदेशी गुंतवणूकदारांचा 'डॉलर रिटर्न' कमी होतो. परिणामी, चलन जोखीम टाळण्यासाठी ते आपला पैसा सुरक्षित पर्यायांकडे वळवत आहेत.
नफावसुलीचे वातावरण आणि जागतिक तणाव
सध्या बाजारात नफा कमावण्याकडे अधिक कल दिसत आहे. आगामी काळात जागतिक स्तरावर व्यापारिक निर्बंध आणि भू-राजकीय तणाव कोणत्या दिशेला जातो, याकडे एफआयआय बारीक लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत जागतिक अनिश्चितता कमी होत नाही आणि रुपयात स्थिरता येत नाही, तोपर्यंत परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू होण्याची चिन्हे धूसर आहेत.
आयटी क्षेत्रातील 'गुड न्यूज' ठरली निष्प्रभ
देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले आहेत. सामान्यतः अशा निकालांनंतर बाजार उसळी घेतो, मात्र यावेळी भू-राजकीय तणाव आणि नव्या टॅरिफ धोरणांच्या भीतीमुळे या सकारात्मकतेवर पाणी फेरले गेले आहे. 'रेलीगेयर ब्रोकिंग'च्या तज्ज्ञांनुसार, जागतिक व्यापार धोरणांबाबतच्या भीतीमुळे आयटी क्षेत्रातील चांगल्या कमाईचाही विक्री रोखण्यासाठी उपयोग झाला नाही.
