Anil Agarwal : आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगातून सावरत असतानाच, वेदांता समूहाचे (Vedanta Group) अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एक ऐतिहासिक आणि अत्यंत भावनिक निर्णय घेतला आहे. आपल्या ४९ वर्षीय पुत्राच्या अकाली निधनानंतर अग्रवाल यांनी आपली ७५ टक्के संपत्ती समाजसेवेसाठी अर्पण करण्याची घोषणा केली आहे. "आता मी कंपनीचा मालक नाही, तर समाजाचा एक विश्वस्त म्हणून काम करेन," असे भावनिक उद्गार त्यांनी काढले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याने मिळाले बळ
नुकत्याच पार पडलेल्या 'इंडिया एनर्जी वीक'मध्ये अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी अग्रवाल यांचे सांत्वन केले आणि त्यांना देशहितासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. या भेटीनंतर अग्रवाल यांनी समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ केला. आपल्या दिवंगत मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अग्रवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात १५ हजार कोटी रुपये खर्च करण्याचा मानस पंतप्रधानांजवळ व्यक्त केला आहे.
प्रमोटर नाही, 'ट्रस्टी' म्हणून नवी ओळख
अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे ३५१.८८ अब्ज रुपये (सुमारे ४.२ अब्ज डॉलर्स) आहे. या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांनी लोककल्याणासाठी देण्याचे ठरवले आहे. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती देताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ते समाजासाठी काहीतरी मोठे करू इच्छितात.
Last week, I was invited to attend and speak at the ‘PM’s Roundtable with Global Energy Leaders’ on the sidelines of the India Energy Week.
— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) February 3, 2026
This was the first official meeting I attended after the tragedy in our family. I am very grateful to Pradhan Mantri ji who expressed his…
४९ व्या वर्षी अकाली एक्झिट
अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे गेल्या महिन्यात वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. स्कीइंग करताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाच्या जाण्याने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, ज्याला अनिल अग्रवाल यांनी आपल्या आयुष्यातील 'काळा अध्याय' म्हटले होते.
देशाकडून अग्रवाल यांच्या निर्णयाचे कौतुक
सोशल मीडियावर सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. एका युजरने म्हटले की, "१५ हजार कोटी ही मोठी रक्कम आहेच, पण एका पित्याने आपल्या मुलाच्या आठवणीत देशासाठी दिलेले हे वचन अविस्मरणीय आहे."
