Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी मागील आठवडा चढ-उतारांनी भरलेला असला तरी, देशातील टॉप १० कंपन्यांसाठी मात्र तो अत्यंत लाभदायक ठरला आहे. या टॉप १० कंपन्यांपैकी तब्बल ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली. या एकाच आठवड्यात या ७ कंपन्यांनी मिळून १,२८,२८१.५२ कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे.
सर्वाधिक फायदा रिलायन्स आणि एअरटेलला
या आठवड्यात देशातील दोन कंपन्यांनी सर्वाधिक कमाई केली, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल आघाडीवर आहेत. देशातील सर्वात मोठ्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ३६,६७३ कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली. यामुळे कंपनीचे एकूण बाजार भांडवल २०,९२,०५२.६१ कोटी रुपये झाले आहे. भारती एअरटेल या मोठ्या दूरसंचार कंपनीलाही शेअर बाजाराने निराश केले नाही. एअरटेलच्या मार्केट कॅपमध्ये ३६,५७९.०१ कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप १२,३३,२७९.८५ कोटी रुपयांवर पोहोचले.
आयटी आणि बँकिंग क्षेत्राचीही चांगली कामगिरी
देशातील दोन सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांनी आणि प्रमुख बँकांनीही उत्तम कामगिरी केली. इन्फोसिस कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये १७,४९०.०३ कोटी रुपयांची वाढ झाली, तर एकूण बाजार भांडवल ६,४१,६८८.८३ कोटी रुपये झाले. टीसीएस देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये १६,२९९.४९ कोटी रुपयांचा फायदा झाला.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल १५,३५,१३२.५६ कोटी रुपयांवर पोहोचले. तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या मार्केट कॅपमध्ये ४,८४६.०८ कोटी रुपयांची वाढ झाली. देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या मार्केट कॅपमध्ये १,७८५.६९ कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली.
या कंपन्यांना झाले नुकसान
टॉप १० मधील ७ कंपन्यांना फायदा झाला असला तरी, तीन कंपन्यांना मात्र तोटा सहन करावा लागला. बजाज फायनान्स, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँक या तिघांचे एकूण मार्केट कॅप एकत्रितपणे १४,०१५.२५ कोटी रुपयांनी घटले.
एनबीएफसी क्षेत्रातील बजाज फायनान्स या मोठ्या कंपनीला ८,२४४.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या मार्केट कॅपला ४,५२२.३८ कोटी रुपयांचा फटका बसला. देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या खासगी बँक आयसीआयसीआयला १,२४८.०८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
वाचा - तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
एकंदरीत, या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात लार्जकॅप कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळाला.
