मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर मोठे संकट निर्माण झाले होते. विशेषतः कतरकडून होणारा नैसर्गिक वायू पुरवठा थांबल्यानंतर देशात CNG, PNG आणि युरिया उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या कठीण परिस्थितीत Shell या जागतिक ऊर्जा कंपनीने पुढाकार घेत भारतासाठी ‘संजीवनी’ची भूमिका बजावली आहे.
भारत आपल्या एकूण नैसर्गिक वायू गरजेपैकी जवळपास निम्मा वायू आयात करतो. त्यातील सुमारे ४५-५० टक्के हिस्सा कतारकडून येतो. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर कतारने पुरवठा थांबवला, ज्यामुळे ११.२ मिलियन टन LNG आयात धोक्यात आली.
शेलची तात्काळ हालचाल
या संकटाच्या काळात शेलच्या भारतीय युनिटने तात्काळ पुढाकार घेतला. कंपनीने आपल्या जागतिक नेटवर्कचा वापर करून ओमान, ऑस्ट्रेलिया आणि नायजेरिया येथून गॅस आयात करून तुटवडा भरून काढला. यामुळे मार्च महिन्यात शेल भारतातील सर्वात मोठी गॅस पुरवठादार ठरली.
कृषी आणि घरगुती वापराला मोठा दिलासा
नैसर्गिक वायूचा थेट परिणाम युरिया खत उत्पादन, CNG (वाहन इंधन) आणि PNG (घरगुती गॅस) यावर होतो. कतार पुरवठा थांबल्यानंतर युरिया उत्पादनावर संकट निर्माण झाले होते. मात्र, शेलने ६ TBTU पैकी ४ TBTU गॅस पुरवठ्याचा करार मिळवत परिस्थिती सावरली. यामुळे खत कारखान्यांना पुन्हा गॅस मिळू लागला आणि शेतकऱ्यांवरील संकट टळले.
मजबूत पायाभूत सुविधा ठरल्या निर्णायक
संकटाच्या काळात गॅस वाहतुकीसाठी जहाजांची कमतरता मोठे आव्हान ठरते. शेलकडे ६५ पेक्षा अधिक जहाजांचा स्वतःचा ताफा असल्याने त्यांनी जलद गतीने गॅस भारतात पोहोचवला. गुजरातमधील हजीरा येथे कंपनीचा एलएनजी टर्मिनल असून त्याची वार्षिक क्षमता ५० लाख टन आहे. यामुळे पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे शक्य झाले.
पुरवठा स्थितीत लक्षणीय सुधारणा
सुरुवातीला काही उद्योगांच्या गॅस पुरवठ्यात ४०% पर्यंत कपात करण्यात आली होती. मात्र, शेलच्या वाढीव आयात आणि देशांतर्गत उत्पादन (सुमारे 92 MMSCMD) यांच्या समन्वयामुळे परिस्थिती सुधारली. एप्रिलपासून युरिया प्रकल्पांना ९०-९५% गॅस पुरवठा मिळू लागला आहे. तसेच सिटी गॅस आणि व्यावसायिक वापरातही १०% वाढ करण्यात आली आहे. शेल एप्रिलमध्येही याच वेगाने गॅस पुरवठा सुरू ठेवणार आहे. त्यामुळे देशात नव्या ऊर्जा संकटाची शक्यता कमी झाली आहे.
