SEBI New Rule :शेअर बाजारातील चढ-उतारांपासून सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. २६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, आता 'ॲक्टिव्हली मॅनेज्ड इक्विटी म्युच्युअल फंड' आपल्या पोर्टफोलिओमधील काही हिस्सा सोने आणि चांदीमध्ये गुंतवू शकणार आहेत. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनाशेअर बाजारातील पडझडीच्या काळात सोन्याच्या झळाळीचा आधार मिळणार आहे.
पोर्टफोलिओला मिळणार 'सुरक्षा कवच'
आतापर्यंत इक्विटी फंडांमधील उरलेला पैसा प्रामुख्याने रोख किंवा मनी मार्केटमध्ये ठेवला जात असे. मात्र, नव्या नियमांनुसार फंड मॅनेजर्सना पोर्टफोलिओच्या ३५ टक्क्यांपर्यंत रक्कम मौल्यवान धातूंमध्ये गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
'ॲसेट एलिक्सिर'चे संस्थापक शिवम पाठक यांच्या मते, "जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा सोने आणि चांदी सहसा चांगली कामगिरी करतात. अशा परिस्थितीत, पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असल्यास गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल." विशेषतः जागतिक तणाव किंवा महागाईच्या काळात हे पाऊल मैलाचा दगड ठरेल.
परताव्यावर काय परिणाम होणार?
सोन्यामुळे पोर्टफोलिओला स्थिरता मिळत असली तरी, गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
सोने 'पोर्टफोलिओ स्टेबलायझर' म्हणून काम करेल.
जेव्हा शेअर बाजार तेजीत असेल, तेव्हा सोन्याच्या उपस्थितीमुळे फंडाचा एकूण परतावा थोडा कमी दिसू शकतो, कारण दीर्घकाळात सोन्याची वाढ इक्विटीच्या तुलनेत संथ असते, असे 'आनंद राठी वेल्थ'चे कार्यकारी संचालक चिराग मुनि यांनी स्पष्ट केले.
गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?
या नवीन बदलामुळे 'ओव्हर-ॲलोकेशन'चा (गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक) धोका निर्माण होऊ शकतो.
जर तुम्ही आधीच Gold ETF किंवा Sovereign Gold Bond (SGB) मध्ये गुंतवणूक केली असेल आणि आता तुमच्या इक्विटी फंडानेही सोन्यात गुंतवणूक सुरू केली, तर तुमच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढू शकते.
जानेवारी २०२६ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये १०% आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये २४% घसरण झाली होती. त्यामुळे मौल्यवान धातूही जोखमीपासून मुक्त नाहीत, हे गुंतवणूकदारांनी विसरू नये.
वाचा - युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
