SEBI on Stock Market : पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी विक्री पाहायला मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल २६.७७ लाख कोटी रुपये मातीमोल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी गुंतवणूकदारांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
९ दिवसांत २६.७७ लाख कोटींचे नुकसान
इस्रायल आणि अमेरिका यांनी २८ मार्च रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारपेठेतही घबराट पसरली. या युद्धाच्या परिणामामुळे २ मार्चपासून बाजारात मोठी घसरण सुरू झाली. २ मार्च ते १३ मार्च या नऊ दिवसांच्या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल २६,७७,२६३.६९ कोटींनी घटले आहे. होळी आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्या वगळता, प्रत्येक सत्रात गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
सेबी प्रमुखांचे 'थ्री-पॉइंट' मार्गदर्शन
गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुहिन कांत पांडेय यांनी शनिवारी महत्त्वाची विधाने केली.
- संयम हीच सर्वोत्तम रणनीती : "अनिश्चित काळात संयम राखणे हाच सर्वात मोठा नफा असतो. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा काळात घाईने निर्णय घेऊ नयेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
- बाजार स्थिर होतोच: कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा दाखला देत पांडेय म्हणाले की, इतिहासाने हे सिद्ध केले आहे की मोठ्या पडझडीनंतर बाजार पुन्हा सावरतो आणि स्थिर होतो.
- अस्थिरता हा बाजाराचा स्वभाव: अनिश्चितता हा वित्तीय बाजाराचा एक नैसर्गिक भाग आहे. आव्हाने असतानाही आपली सिस्टीम किती निष्पक्ष आणि प्रभावीपणे काम करते, यावर गुंतवणूकदारांचा विश्वास असणे गरजेचे आहे.
बाजारावर कशाचा दबाव?
ऊर्जा संकट: मध्य आशियातील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.
जागतिक अनिश्चितता: तंत्रज्ञान बदल, एआयचा वाढता वापर आणि भू-राजकीय तणाव यांमुळे गुंतवणूकदार सध्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.
वाचा - देशात खरच गॅस टंचाई आहे का? तेल विपणन कंपन्यांनी अखेर सांगून टाकलं; ग्राहकांना केलं आवाहन
तज्ज्ञांचे मत
सेबी प्रमुखांच्या मते, जर आपण संस्थात्मक ताकद, पारदर्शकता आणि सुशासन राखले, तर भारतीय भांडवली बाजार या संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडेल.
