EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ७ लाखांहून अधिक निष्क्रिय खात्यांमध्ये ३०.५२ कोटी रुपये अडकले आहेत, जे लवकरच संबंधित खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत केले जातील. एका अधिकृत सूत्रानं सोमवारी ही माहिती दिली. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत ७.११ लाख निष्क्रिय खात्यांचा निपटारा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी प्रत्येक खात्यात १००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे.
बंद पीएफ खात्यांमध्ये १०,९०३ कोटी रुपये जमा
ईपीएफओचं एखादं खातं तेव्हा निष्क्रिय मानलं जातं, जेव्हा त्यामध्ये ३६ महिन्यांहून अधिक काळ कर्मचारी किंवा नियोक्त्याकडून कोणतीही रक्कम जमा झालेली नसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३१.८६ लाख निष्क्रिय ईपीएफ खात्यांमध्ये १०,९०३ कोटी रुपये जमा आहेत.
होळीपूर्वी आज सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरातही १९१९ रुपयांची घसरण, पाहा नवे दर
यापैकी १००० रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या ७ लाख खात्यांमधील ३०.५२ कोटी रुपयांची रक्कम प्राधान्यानं परत केली जाईल. आधारशी लिंक असलेल्या खात्यांमधील ही पीएफ रक्कम थेट संबंधित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल. खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास, हे पैसे नॉमिनी किंवा वैध वारसाला दिले जातील.
कोअर बँकिंग प्रणालीवर आधारित सुविधा लागू
मंत्रालय स्तरावर ईपीएफच्या सर्व निष्क्रिय किंवा बंद पडलेल्या खात्यांचा टप्प्याटप्प्यानं हे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ईपीएफओ 'ईपीएफओ ३.०' या डिजिटल उपक्रमावर देखील काम करत आहे, ज्याअंतर्गत 'कोअर बँकिंग सिस्टिम'वर आधारित सुविधा लागू केल्या जात आहेत. दावे निकाली काढण्याचा कालावधी २० दिवसांवरून कमी करून तो ३ दिवसांपेक्षा कमी करणं आणि सदस्यांच्या सेवा एकात्मिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय, यूपीआयच्या (UPI) माध्यमातूनही पीएफ खात्यातून पैसे काढण्याची व्यवस्था केली जात आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा आणि सुविधा मिळणार आहे.
