Fuel Crisis : एलपीजी सिलेंडरच्या बुकिंग नियमांबाबतच्या गोंधळानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबतच्या अफवांनी डोकं वर काढलं आहे. गुजरातमध्ये पेट्रोल पंपांवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अफवांचे पीक आले असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारी तेल कंपन्यांना मैदानात उतरावे लागले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बुधवारी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे.
अफवांचे पीक आणि वस्तुस्थिती
गेल्या २४ तासांत गुजरातसह काही राज्यांत पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. इंधन संपणार असल्याच्या भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या फुल्ल करण्यासाठी रांगा लावत होते. या पार्श्वभूमीवर BPCL ने अधिकृत निवेदन जारी केले आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आणि प्रत्येक भागात इंधनाची उपलब्धता पूर्णपणे कायम आहे. तेल कंपन्या पूर्ण क्षमतेने उत्पादन आणि पुरवठा करत असून, त्यात कोणताही अडथळा आलेला नाही. भारताची स्थिती सध्या इंधन आयातदारापेक्षा 'शुद्ध निर्यातदार' अशी आहे. म्हणजेच आपल्याकडे देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त साठा उपलब्ध आहे.
सोशल मीडियावरून 'सावधान'तेचा इशारा
BPCL ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केले आहे. "देशात पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये किंवा पंपांवर गर्दी वाढवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नका, देशात इंधनाचे कोणतेही संकट नाही," असे कंपनीने ठामपणे सांगितले आहे.
वाचा - महागाईचा 'तडाखा': बिस्किटे, चिप्स आणि शॅम्पू महागणार! पाकीट तेच, पण वजन घटणार; १ एप्रिलपासून नवे दर
घाबरण्याचे कारण का नाही?
सरकारी कंपन्यांकडे पुढील अनेक दिवसांचा साठा राखीव आहे. भारत पेट्रोल-डिझेलची निर्यात करतो, त्यामुळे देशांतर्गत टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रिफायनरीपासून ते पेट्रोल पंपापर्यंतची वाहतूक व्यवस्था विनाअडथळा सुरू आहे.
